संपत्ती निर्माण करणारे श्रीमंत होतात


निलेश गोरे : भुसावळ शहरातील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यशाळा

भुसावळ : तरुणाईला श्रीमंत लोकांचे खूप आकर्षण असते, तरुणपणात तर प्रत्येकाला आपल्याकडे पैशांच्या राशी असाव्यात, असे वाटते. श्रीमंतीची स्वप्ने रंगवण्यात तर आपला हात कुणीच धरू शकणार नाही. पण वयाच्या पस्तिस चाळीशी नंतर आपल्यापैकी 90% जणांच्या लक्षात येते की आपल्याला अपेक्षित असलेली श्रीमंती आपल्या आवाक्यात नव्हती, ते फक्त एक स्वप्न होते आणि पुढचे आयुष्य आता आपल्याला मध्यमवर्गीय म्हणूनच जगावे लागणार आहे. श्रीमंत व्हायचे असेल तर आधी श्रीमंती म्हणजे काय ते समजून घेतले पाहिजे. श्रीमंत लोक श्रीमंत का होतात ? याचा अभ्यास केला पाहिजे. पैसा आणि श्रीमंती यातला फरक ओळखता आला पाहिजे, असा सल्ला श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित कार्यशाळेत समुपदेशक निलेश गोरे यांनी विद्यार्थ्यांना दिला. यशस्वी कसं व्हायचं? श्रीमंती म्हणजे काय ? श्रीमंत लोक श्रीमंत कशामुळे होतात ? श्रीमंत होण्यात आपण कुठे कमी पडतोय ? या बद्दलचे सिक्रेट्स वेलनेस फाऊंडेशनचे निलेश गोरे यांनी प्रसंगी सांगितले.

लक्ष केंद्रीत व्यक्ती
निलेश गोरे पुढे म्हणाले की, संपत्ती निर्माण करणारे श्रीमंत होत असतात. तरुणाईचा कल हा जबाबदारीपेक्षा मौजमजेकडे जास्त आहे. त्यामुळे निरर्थक खर्च होतो व परीणामी आर्थिक वृद्धी होत नाही असं त्यांनी सांगितले. जास्त मौजमजा बाळगणारे असमाधानी राहतात सोबतच त्यांना नेहमीच पैश्यांची तंगी असते. त्याउलट जबाबदारीने वागणारे दिवसागणिक श्रीमंत होत जातात समाधानी आनंदी राहतात व त्यांना पैश्यांची तंगी जाणवत नाही म्हणून लक्ष केंद्रित व्यक्ती बना असंही त्यांनी ठळक केलं. बिल गेट्स, मार्क झुकेरबर्ग व अंबानी यांचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, यांची गुंतवणूक ज्या कंपन्यांत आहे त्या कंपन्यांचे शेअर्स दिवसेंदिवस वाढत आहेत म्हणून यांची श्रीमंती वाढत आहे. सोबत ही गुंतवणूक त्यांना वर्षाला करोडो रुपये सुद्धा देते. म्हणजे ही संपत्ती स्वतः वाढतेच सोबत दरवर्षी काहीतरी अतिरीक्त परतावाही देते. श्रीमंत लोक श्रीमंत आहेत म्हणजे त्यांना दररोज करोडो रुपये हातात येतात असे नाही, तर त्यांची जी संपत्ती आहे ती दररोज कणाकणाने वाढत आहे आणि त्यांना दररोज अधिकाधिक श्रीमंत बनवत आहे.

ध्येय साध्य करण्याच्या दिशेने विचार करा
विद्यार्थ्यंना गोल सेटिंगचे सिक्रेट सांगतांना निलेश गोरे म्हणाले की, निष्पत्ती आणि ध्येय यातील फरक ओळखा कारण बहुतांशी तरुण हे निष्पत्तीलाच ध्येय समजतात आणि भरकटतात व स्वप्न अपुरे राहतात. तुमचे ध्येय बिझनेसचे असू द्या किंवा इतर काहीही ते तुमच्या डोक्यात पक्के करा. आता त्या ध्येयांना तुमच्या जीवनाचा भाग बनवा. तुम्ही ही ध्येय कशाप्रकारे साध्य कराल, यावर भर द्या. तुमच्या ध्येयांना जीवनात प्राधान्य द्या. तेव्हा तुम्ही ध्येय साध्य करण्याच्या दिशेने विचार कराल, असे केल्यास तुम्ही ठरवलेले ध्येय आणि अपेक्षा साध्य करू शकता व यश मिळवता येईल. सोबतच ध्येयावर लक्ष कसे केंद्रित करावे? द्विधा मनस्थिती कशी टाळावी व एकनिष्ठ होवून ध्येय कशे गाठावे याबद्दलचे मार्गदर्शन त्यांनी केले. श्रीमंत होणं आणि श्रीमंती टिकवणं वाटतं तेवढ सोपं नसतं. त्याला भरपूर बुद्धिबळ वापरावे लागते व कष्ट ही तेव्हढेच करावे लागतात. प्रसंगी प्रा.एस.व्ही.राजपूत, प्रा.किशोर चौधरी, प्रा.धीरज पाटील व विद्यार्थी उपस्थित होते.


कॉपी करू नका.