यावलमध्ये सात बटूंवर सामूहिक व्रतबंध संस्कार
यावलमध्ये पुरोहित संघाच्या वतीने कोळेश्वर राम मंदिरात सामूहिक वंतबंध संस्कार
यावल : शहरातील पुरोहित संघाच्या वतीने मंगळवारी सामूहिक व्रतबंधनाचा कार्यक्रम कोळेश्वर राम मंदिर येथे सकाळी 10.30 वाजता झाला. त्यात सात बटूंना सामूहिक व्रतबंधन संस्कार करण्यात आले. यानिमित्त शहरासह परीसरातील समाज बांधव एकत्र आले. यावल शहर पुरोहित संघ गेल्या बर्याच वर्षांपासून सामूहिक व्रतबंधनाचा कार्यक्रम आयोजित करतो. दरवर्षी समाजातील बटूंच्या सामूहिक व्रतबंधनाचा कार्यक्रम होतो. यावर्षी देखील मंगळवारी सामूहिक व्रतबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग
या कार्यक्रमाचा उद्देश समाजातील सर्व स्तरातील समाजबांधव एकत्रीकरण करणे व ज्या सामान्य समाज बांधवांना वैयक्तिक मुंज विधी पार पडणे शक्य नसेल तसेच ज्या मुलांना पालक नसतील अशा मुलांच्या देखील मुंजी या कार्यक्रमात घेणे हा असतो. पालक नसलेल्या मुलांना पुरोहित संघातील एक जोडपे त्या मुलाचे पालक म्हणून पूजा विधीमध्ये बसतात व सदर मुलाचे वृत्त बंधन पार पाडले जाते. या सामूहिक वृत्त वंदनासाठी कोणत्याही स्वरूपाची पावती अथवा देणगी मागितली जात नाही. ज्या कुणी समाज बांधवाला स्वतःहून आर्थिक मदत अथवा वस्तू स्वरुपात मदत करायची असेल अशांचीच मदत या कार्यक्रमाला घेतली जाते हे विशेष. मंगळवारी सकाळी 9 वाजेपासून शहरातील कोहळेश्वर राम मंदिरात व्रतबंधन संस्कार कार्यक्रमाची सुरुवात झाली होती, या सामूहिक व्रतबंधना साठी यावेळेस एकूण सात बटू पूजेला बसले होते. तालुक्यासह बाहेर गावाहून देखील समाज बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते. सकाळी साडेदहा वाजता मुंज विधि पार पडून पुढील संस्कार वेदशास्त्रसंपन्न श्याम शास्त्री नाईक, वेदशास्त्रसंपन्न नारायण शास्त्री बयानी यांच्या मार्गदर्शनाखाली मनीष तांबोळी, भूषण कुलकर्णी, उमेश सराफ गुरुजी यांनी पूजा विधी पार पडली.
समाज बांधवांनी उपक्रमशील व्हावे
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व समाजबांधवांनी एकत्र येऊन अशाचं प्रकारे चांगले उपक्रम राबवावे जेणेकरून आपण आपल्या पुढील पिढीला चांगला संदेश तसेच चांगले संस्कार देऊ शकू, असे मनोगत किशोर कुलकर्णी, प्रा.विद्या सोनटक्के, दिलीप वेद्य रावेर यांनी व्यक्त केले. बटुंसोबत उपस्थित सर्व नातेवाईक आणि शहरातील सर्व समाज बांधवांच्या जेवणाची व्यवस्था विधीनंतर करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष राजेश बयानी, उपाध्यक्ष अतुल बाविसे, खजिनदार इंद्रजीत जोशी, सचिव मोरेश्वर बयानी, शिरीष कुलकर्णी, पराग सराफ, महेश बयानी, हेमंत मुळे, भूषण कुलकर्णी, निखील वैद, मयुर जोशी, सारंग बाविसे, संजय वैद्य, विनोद बायानी, विक्रम नाईक, अभय नाईक, प्रशांत जोशी, रवी कुलकर्णी, यांच्यासह सर्व पुरोहित संघ, समस्त ब्राह्मण समाज यावल यांनी परीश्रम घेतले.

