अविवाहित असल्याचे सांगत चक्क दोन मुलांच्या मातेने केले लग्न
तिघांविरुद्ध औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल : आरोपी महिलेला अटक
औरंगाबाद : दोन मुलांची माता असतानाही आपण अविवाहित असल्याचे सांगत एका महिलेने पाचोरा तालुक्यातील इसमाची फसवणूक केली तर या प्रकरणी औरंगाबादच्या क्रांती चौक पोलिस ठाण्यात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, कविता रमेश देठे ऊर्फ सीमा अनिल रेसवाल या आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. एजंट महिला सीमा रवी राठोड ऊर्फ सविता किसन माळी आणि अमोल रमेश देठे यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
तिघांविरूद्ध गुन्हा दाखल
पाचोरा तालुक्यातील एका तक्रारदाराची औरंगाबादेतील अमोल रमेश देठे याच्याशी ओळख झाल्यानंतर त्यांनी लग्नाबाबत इच्छा व्यक्त केल्यानंतर देठे यांनी स्थळ सूचवले. एका महिलेची ओळख करून दिल्यानंतर या महिलेने आपण अविवाहित असल्याचे सांगितल्याने 30 जानेवारी 2019 रोजी जळगावात विवाह पार पडला मात्र देठे आणि मध्यस्थी करणार्या महिलेने पाटीलकडून एक लाख रुपये रोकड आणि अंदाजे पंधरा हजार रुपयांचे दागिने करून घेतले तर आईची प्रकृती बिघडल्याचे कारण सांगून ती महिला पतीला औरंगाबादमध्ये घेवून आली व लघूशंकेचे निमित्त करून बाहेर पडली मात्र न परतल्याने आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले. या प्रकरणी अमोल रमेश देठेसह दोन महिलांविरुद्ध 12 फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंदविण्यात आला.



