अजित पवारांच्या मृत्यूने आम्हालाही यातना मात्र यात राजकारण नको : शरद पवार
We too are pained by Ajit Pawar’s death, but let’s not politicize this: Sharad Pawar बारामती (28 जानेवारी 2026) : अजित पवारांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्यूनंतर पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जींसह अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. हा अपघात म्हणजे एक घातपात असल्याचा संशय व्यक्त झाल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अत्यंत भावुक अंतःकरणाने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राचे कधीही न भरून निघणारे हे मोठे नुकसान आहे. हा निव्वळ एक अपघात असून यामध्ये कोणतेही राजकारण नसल्याचे स्पष्ट करतानाच त्यांना शोक अनावर झाला. ते म्हणाले की, खरे तर आज मी प्रसारमाध्यमांसमोर येणार नव्हतो, असे नमूद करत त्यांनी आपल्या पुतण्याला गमावल्याचे दुःख अत्यंत जड अंतःकरणाने व्यक्त केले.
अजित पवारांचा मृत्यू अपघातामुळेच
प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, अजित पवार यांचा हा अपघाती मृत्यू आहे. त्याचा महाराष्ट्राला प्रचंड असा धक्का आहे. एक कर्तृत्ववान, निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे, अशा व्यक्तीला महाराष्ट्र मुकला आहे. जे काही नुकसान झाले ते भरून निघणारे नाही पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. हा अपघात आहे. यामागे काही राजकारण आहे, अशा प्रकारची भूमिका मांडली गेली. मात्र यात राजकारण नाही. हा निव्वळ अपघात आहे. त्याच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना आहेत. कृपा करून इथे राजकारण आणू नये, असे पवारांनी म्हटले आहे.

काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?
अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांचा दिल्ली दौरा रद्द केला आहे. त्या म्हणाल्या, कोणीही सुरक्षित नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली योग्य चौकशी आवश्यक आहे. हे अनावश्यक भीती निर्माण करणारे आहे की कट आहे, हे काळच सांगेल. तथापि, सर्वात सोपा मार्ग म्हणजे पायलटला दोष देणे, जसे आपण मागील दोन प्रकरणांमध्ये पाहिले आहे.
विमान अपघाताची चौकशी करणार : एकनाथ शिंदे
अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मोठा भाऊ हरपल्याची भावना माझ्या मनात आहे. डोंगरा एवढं दुःख आहे. महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे. या विमान अपघाताची चौकशी करणार आहोत. आमच्या सहकार्याचा जीव गेल्याने नक्कीच विमान अपघाताची चौकशी होणार. असे अपघात पुन्हा होता कामा नये म्हणून चौकशी करणार, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
घाणेरडे राजकारण सुरू : फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्वतः स्पष्टपणे म्हटले आहे की, हा एक अपघात होता ज्यामध्ये लोकांचे प्राण गेले आणि या मुद्यावर कोणतेही राजकारण होऊ नये. फडणवीस म्हणाले, मला खूप दुःख आहे की आपण अशा काळात पोहोचलो आहोत जिथे एखाद्याच्या मृत्यूवरही घाणेरडे राजकारण खेळले जात आहे. मला खूप दुःख आहे की ममता असे विधान करत आहेत. राजकारणात इतके खालच्या पातळीवर जाणे पूर्णपणे चुकीचे आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्राचे अत्यंत प्रिय आणि आदरणीय नेते अजित यांच्या मृत्यूचे राजकारण करणे पूर्णपणे चुकीचे आहे आणि असे विधान करायला नको होते.’







