अजितदादा पवार विमान दुर्घटनेची होणार सीआयडी चौकशी
A CID inquiry will be conducted into the plane crash involving Ajit Pawar बारामती (30 जानेवारी 2026) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी, 28 रोजी बारामती येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाल्याने राज्यावर शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या अचानक जाण्याने केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिक आणि प्रशासकीय पातळीवरही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अंत्यसंस्कारानंतर आता या विमान अपघाताच्या तपासाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली असून राज्य सरकारने या दुर्घटनेची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच बारामती पोलिसांना अपघातस्थळावर कोणालाही प्रवेश देऊ नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. तपास प्रक्रियेत कोणतीही छेडछाड होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
फॉरेन्सिक पथकाने गोळा केले नमूने
दरम्यान, फॉरेन्सिक पथकाने याआधीच अपघातस्थळी भेट देऊन आवश्यक नमुने तपासणीसाठी गोळा केले आहेत. विमानाचे अवशेष, जळालेल्या भागांचे नमुने आणि इतर तांत्रिक बाबींची तपासणी सुरू आहे. हा संपूर्ण तपास बारामती पोलिसात नोंद असलेल्या ‘एक्सिडेंटल डेथ रिपोर्ट’च्या अनुषंगाने केला जाणार आहे. सीआयडी तपासात फॉरेन्सिक अहवाल, एटीसी लॉग्स आणि प्राथमिक माहिती यांचा सखोल अभ्यास केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
रनवे दिसत नसल्याचे स्पष्टीकरण
सरकारच्या प्राथमिक अहवालानुसार, हे विमान 28 जानेवारी रोजी सकाळी 8.18 वाजता पहिल्यांदा बारामती एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या संपर्कात आले होते. त्यावेळी वैमानिकांना सांगण्यात आले की, हवामान सामान्य आहे, वार्याचा वेग कमी आहे आणि दृश्यमानता सुमारे 3000 मीटर इतकी आहे. यानंतर वैमानिकांनी रनवे क्रमांक 11 च्या दिशेने येत असल्याची माहिती दिली मात्र त्यांना रनवे स्पष्टपणे दिसत नसल्याचे त्यांनी एटीसीला कळवले होते.
अन् कोसळले विमान
थोड्या वेळाने पायलटने पुन्हा एटीसीला कळवले की, रनवे दिसू लागल्यावर ते माहिती देतील. त्यानंतर सकाळी 8.43 वाजता रनवे क्रमांक 11 लँडिंगसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे एटीसीकडून कळवण्यात आले मात्र यानंतर पायलटकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काही क्षणातच धावपट्टीच्या डाव्या बाजूला अचानक मोठ्या ज्वाळा आणि धुराचे लोट उठताना दिसले, अशी माहिती एटीसीवर कार्यरत असलेल्या एका अधिकार्याने दिली आहे. या दृश्याने नियंत्रण कक्षातही एकच खळबळ उडाली होती.
संपूर्ण चौकशी केली जाणार
या अपघाताच्या शेवटच्या काही मिनिटांत नेमके काय घडले, याचा उलगडा सीआयडीचौकशीतून होण्याची शक्यता आहे. वैमानिकांची भूमिका, तांत्रिक बिघाड, हवामान स्थिती आणि एटीसीशी झालेला संवाद या सर्व बाबी तपासाच्या केंद्रस्थानी असणार आहेत. अजित पवार यांच्यासारख्या राज्यातील महत्त्वाच्या नेत्याच्या मृत्यूमुळे हा तपास अत्यंत संवेदनशील मानला जात आहे.
