पंतप्रधानांवर आमचा पूर्ण विश्वास : आधी पीओके व नंतर संपूर्ण पाकिस्तान ताब्यात घ्यावे ; खासदार राऊतांची खोचक टीका
मुंबई (31 मे 2026) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, त्यांनी ऑपरेशन सिंदूर 1 मध्ये पीओके घ्यावे, आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर 2 मध्ये संपूर्ण पाकिस्तान घ्यावे, असा खोचक टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
तर मंत्र्यांना करा बडतर्फ
संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश पाळले जात नसतील तर मंत्र्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार देवेंद्र फडणवीस यांना आहे. त्यांनी कारवाई करत आदर्श घालून द्यावा. आमच्या अमृता वहिनी सायकल घेऊन फिरतात, आणि त्यांचे मंत्री असा ताफा घेऊन फिरत आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे संजय राठोड यांच्या ताफ्यावरील प्रश्नावर बोलाताना राऊतांनी म्हटले आहे.
1948 मध्ये गेलेले तीन प्रांत आधी ताब्यात घ्या
संजय राऊत म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर 1 अजून संपलेले नाही, मग ऑपरेशन सिंदूर 2 आले कुठून? मुळात ऑपरेशन 1 पूर्ण झालेले नाही. ऑपरेशन 1 हे आंतरराष्ट्रीय राजकीय दबावामुळे आपण बंद केले. त्यांचा उद्देश होता की पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यायचे हे सर्वांना माहिती आहे. ते आधी ताब्यात घ्या. 1948 मध्ये भारताच्या ताब्यातील 3 प्रांत जे पाकिस्तानकडे गेले ते ऑपरेशन 1 मध्ये घेण्याचे भारताचे ध्येय होते. पण हेच पूर्ण झाले नाही आणि लष्कर प्रमुख ऑपरेशन 2 ची घोषणा करताय ही 2029 च्या निवडणुकीची तयारी आहे का? असा सवाल राऊत यांनी केला आहे. देशाचा भुगोल याने वाढणार असेल तर आम्ही त्याचे स्वागत
करू.
भाजपविरोधात लढायला देशातील जनता सज्ज
संजय राऊत म्हणाले की, अभिषेक बॅनर्जी यांच्यावर ज्या पद्धतीने भाजपच्या सरकारने हल्ला घडवला त्याचा धिक्कार करावा तेवढा कमी आहे. राष्ट्रीय पक्षाच्या सरचिटणीस असणार्या खासदारांवर जो हल्ला झाला यातून देशातील पुढचे चित्र काय असेल हे स्पष्ट झाले आहे. जे विरोधक आमच्याविरोधात लढतील त्यांना आम्ही रस्त्यावर संपवू हा इशारा जर भाजप देऊ इच्छित असेल तर देशातील जनता तुमच्याविरोधात लढण्यास तयार आहे. आसामध्येसुद्धा हेच सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये जे विष पेरताय यात त्यांचाच बळी गेल्याशिवाय राहणार नाही.
