मोदी सरकारने अमेरिकेसह दोन उद्योगपतींना देश विकला : काँग्रेस नेते नाना पटोले
मुंबई (6 जून 2026) : सत्ताधार्यांनी देश विकला आहे. आपला रुपया मारला आहे. मोदी सरकार आल्यानंतर रुपयाची किंमत कमी झाली आहे. रवीकिशन यांनी बोलताना भान ठेवून बोलले पाहिजे. भाजप सरकारने देश अमेरिकेसह दोन लोकांना विकला आहे. लोकांना मतदानाच्या हक्कापासून दूर ठेवण्याचे काम सरकारने बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये केले आहे. एसआयआरमध्ये एखाद्या समाजातील बांधवांचे नावे वगळली जातात हे चुकीचे आहे. जे व्यक्ती तिथे राहत नाहीत किंवा ज्यांचे निधन झाले आहे, अशा व्यक्तीचे नाव जर मतदार यादीतून रद्द करण्यात आले तर काही हरकत नाही. पण विशिष्ट समाजाच्या बांधवांचे नाव काढणे योग्य नाही, असे स्पष्ट मत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी व्यक्त केले.
बंगालमध्ये बॅनर्जींचा पक्ष संपवण्याचे काम सुरू
नाना पटोले म्हणाले की, भाजपने केंद्रात सत्ता मिळाल्यानंतर विरोधी पक्षांना संपवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांच्यासोबत असणार्या पक्षांनाही त्यांनी संपवले. हे लोकशाहीसाठी घातक आहे. जनमताचा आदर करणे सरकारचे काम असते. पण सरकारने महाराष्ट्रात सुद्धा शिवसेनेचे दोन तुकडे केले, राष्ट्रावादी फोडली तसेच आता ममता बॅनर्जी यांचा पक्षाचे दोन तुकडे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांचा पक्ष संपवण्याचे काम पश्चिम बंगालमध्ये सुरू आहे. भाजप ही लोकशाहीविरोधी व्यवस्था आहे. याचीनोंद जनतेने घेतली पाहिजे.
वाद लावण्याचा प्रयत्न
नाना पटोले म्हणाले की, संजय राऊत यांनी विधान परिषद निवडणुकीत माघार का घेतली गेली याचा आकडा सांगितला आहे. हे सरकार भ्रष्टाचारी सरकार आहे. विधान परिषद निवडणुकीत भाजपने जर घोडेबाजार केला असेल तर ते चुकीचे आहे. मतदारांना विकत घेणे, धमकावणे, गुंडाराज आणण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. भाजपला सत्तेचा खूप माज आला आहे, तो इतका जास्त आहे. कायम सत्तेत राहण्यासाठी जाती-जातींमध्ये वाद लावण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. जनतेमध्ये सरकारविरोधी मोठा राग आहे.



