गोरखपूर-मुंबई एक्सप्रेसमधून एक लाखाची रोकड लांबवली
भुसावळ : गोरखपूर-मुंबई या एक्स्प्रेस गाडीतून शहरातील खडका रोडवरील मिल्लत नगरातील रहिवासी नबाब खान आमीर खान हे प्रवास करीत असतांना ते झोपले असतांना त्यांच्या झोपेचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या बॅगेत ठेवलेले एक लाख रुपयांची रोकड लांबविल्याची घटना 9 जानेवारीला दादर रेल्वे स्टेशन येण्यापूर्वी घडली. याप्रकरणी गुरूवारी रात्री 12.37 वाजता जीआरपी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
झोपेचा फायदा घेत लांबवली रोकड
भुसावळ येथील मिल्लत नगरमधील रहिवासी नबाब खान आमीर खान हे मुबईला गोरखपूर-मुंबई एक्स्प्रेस या गाडीने जी- 5 या डब्यातील 38क्रमांकाच्या सीटवर बसून प्रवास करीत असतांना त्याच्या झोपेचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या बॅगेची चेन उघडून बॅगेत ठेवलेले एक लाख रुपयांची रोकड रक्कम दादर रेल्वे स्टेशन येण्यापूर्वीच लांबवली. नबाबखान यांनी बॅगेत पाहिले असता एक लाख रुपयांची चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. नबाब खान यांनी मुंबई येथून भुसावळ येथे आल्यावर गुरूवारी अज्ञात चोरट्यांविरूध्द एक लाख रुपये चोरीचा गुन्हा दाखल केला. हा भुसावळ पोलिसांनी दादर जीआरपी पोलिस ठाण्याकडे वर्ग केल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

चोर्यांचे प्रमाण वाढले
अनलॉक झाल्यामुळे रेल्वेच्या गाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने रेल्वे गाड्यांमधील चोर्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यामुळे प्रवासी वर्गात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. रेल्वे सुरक्षा बल व जीआरपी यांनी वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवावा, अशी प्रवासी वर्गातून मागणी होत आहे.


