आपत्तीग्रस्तांना राज्य सरकारने तातडीने मदत द्यावी : खासदार रक्षा खडसे


सरकारसह पालकमंत्री व विरोधी पक्षनेत्यांना पत्राद्वारे मागणी

मुक्ताईनगर : जळगाव जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, यावल व चोपडा या तालुक्यामध्ये 27 व 29 मे रोजी झालेल्या जोरदार पाउस व वादळामुळे शेती तसेच राहत्या घरांना मोठा फटका बसला होता. तर काही परीवार आपले छत्र गमावून रातोरात उघड्यावर आले होते. त्यांना राज्य सरकारकडून तत्काळ मदत मिळावी यासाठी खासदार रक्षा खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पत्राद्वारे विनंती केली आहे. मदत मिळण्यासाठी माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसरकारकडे पाठपुरावा करावा, असे निवेदनही केले आहे.

चार तालुक्यात मोठे नुकसान
28, 29 व 30 मे रोजी रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, यावल, चोपडा तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांच्या शेती शिवार व राहत्या घरांचा स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी तसेच विमा कंपनी अधिकारी व प्रतिनिधीसह खासदार रक्षा खडसे यांनी दौरा करून प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली होती तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात नुकसानग्रस्त शेती शिवार व घरांची पाहणी केली होती. यामध्ये मुख्यत: उभी केळी व पपईची पिके जमीनदोस्त झालेली असून नागरीकांची कच्ची घरे सुद्धा संपूर्ण जमीनदोस्त होऊन राहत्या घरांमधील दैनंदिन वापराच्या वस्तू तसेच साठवलेल्या धान्याचे सुद्धा खूप नुकसान झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. यामुळे शेतकरी व नागरीकांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडेच मोडले गेलेले असून त्यामुळे त्यांना पुढील 2 ते 3 वर्ष खूप मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार होता.




नुकसानीनंतर नागरीकांना मदत नाही
आधीच कोरोना महामारीचा सामना करीत शेतकर्‍यांनी बँकेतुन कर्ज काढून मोठ्या कष्टाने पिके उभी केली होती. शेती व घरांच्या नुकसानीचे शासन स्तरावरून व विमा कंपनीद्वारे वस्तूत: पंचनामे झालेले असून एक महिना उलटून सुद्धा आजपावतो नुकसानग्रस्त शेतकरी तर सोडाच आपले रहाते घर गमावलेल्या नागरीकांना शासनाकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळालेली नाही. शासनाच्या नियमाप्रमाणे नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्तांना 15 दिवसात मदत देण्याचे जाहीर करण्यात आलेले आहे परंतु याबाबत शासनाकडून कोणत्याच प्रकारच्या हालचाली दिसून येत नाही त्यामुळे नुकसानग्रस्त नागरीक व शेतकर्‍यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करता त्यांना मोठा दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपापल्या स्तरावरून तत्काळ प्रयत्न करावे, असे खासदार रक्षा खडसे यांनी निवेदनात नमूद केले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !