भुसावळातील रेल्वे अतिक्रमण धारकांचे पुर्नवसन करावे
भुसावळ-मुंबई पॅसेंजरसह अन्य प्रश्न मार्गी लावण्यासाठी रेल्वे राज्यमंत्र्यांना साकडे
भुसावळ : भुसावळातील रेल्वेच्या जागेवर राहणार्या अतिक्रमणधारकांचे पुर्नवसन करण्यासाठी तातडीने केंद्र शासनाने पावले उचलावीत तसेचरेल्वे अतिक्रमण धारकांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलासह हक्काची जागा द्यावी आदी मागण्यांबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना साकडे घालण्यात आले. भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजुमामा भोळे यांच्यासह भारतीय जनता अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहराध्यक्ष राहुल वसंत तायडे यांनी दानवे यांची नुकतीच मुंबईत भेट घेतली. यावेळी भुसावळ शहरातील विविध प्रश्नांवर दानवे यांच्याशी चर्चा करण्यात आली. भुसावळातील रेल्वे अतिक्रमण धारकांच्या पुर्नवसनासाठी प्रयत्न करावेत, अॅप्रेडींस धारकांचा प्रश्न मार्गी लावावा तसेच भुसावळ-मुंबई पॅसेंजरसह अन्य रेल्वे गाड्या सुरळीत सुरू करण्याची मागणी दानवे यांच्याकडे करण्यात आली. मागण्यांबाबत सकारात्मक दखल घेण्याचे आश्वासन देण्यात आले.

