वाहनांना दोर बांधून ढकलत जळगावात काँग्रेसचे महागाईविरोधात आंदोलन
मोदी सरकारविरोधात जळगावात पदाधिकार्यांची जोरदार घोषणाबाजी
जळगाव : जळगावात काँग्रेसच्या वतीने शास्त्री टॉवर येथे सोमवारी महागाई मुक्त भारत आंदोलनाअंतर्गत पेट्रोल- डिझेल- गॅसच्या रोजच्या दरवाढीमुळे वाहनांना दोर बांधून ढकलत आंदोलन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी सरकारचा निषेध करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
इंधनाचे दर गगनाला भिडले
जिल्हा काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी खा. डॉ उल्हास पाटील यांच्या नेतृत्वाखाली व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार व युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत महागाई मुक्त भारत आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार महागाईवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरले आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या काळात 136 दिवस पेट्रोल, डिझेलची दरवाढ रोखून धरली आणि निवडणुका संपताच दररोज दरवाढ केली जात आहे असा आरोप करण्यात आला. सर्वसामान्यांना त्रस्त करणा-या महागाईविरोधात आवाज बुलंद करत झोपी गेलेल्या केंद्रातील भाजप सरकारला जागे करण्यासाठी 31 मार्चपासून राज्यभर ‘महागाईमुक्त भारत’ आंदोलनाचा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.


गरज सरो अन वैद्य मरो : डॉ.उल्हास पाटील
डॉ. पाटील म्हणाले की, ‘गरज सरो, वैद्य मरो’ या म्हणीसारखा भाजपाचा कारभार आहे. निवडणुकीत जनतेच्या रोषाला सामारे जायला नको म्हणून इंधन दरवाढ रोखून धरली आणि निवडणुका संपल्या मते घेतली निवडणून आले आणि लगेचच जनतेवर महागाईचा भार टाकण्यास सुरुवात केली आहे. मागील आठ दिवसात पेट्रोल, डिझेल 5.90 रुपये प्रति लिटर महाग झाले आहे तर एलपीजी गॅस सिलिंडर 50 रुपयांनी महाग झाला आहे. काही ठिकाणी एलपीजी सिलिंडर 1000 ते 1100 रुपये एवढ्या किमतीला घ्यावा लागत आहे. सीएनजी, पीएनजी गॅस तसेच खाद्यतेलाचे दरही वाढले असून आजपासून औषधांचे दरही वाढणार आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार जनतेला महागाईच्या खाईत लोटत असून त्याबद्दल त्यांना काहीही वाटत नाही. दी सरकारच्या या निर्णयाचे चटके देशातील जनता भोगत असून केंद्र सरकारला जागे करण्यासाठी आज पेट्रोल डिझेल दरवाढीला त्रस्त वाहनांना दोर बांधून ढकल गाडी आंदोलन केले याचा अर्थ असा की भविष्यात अशाच प्रकारे दरवाढ राहिली तर खरच सर्व सामन्यांना वाहन चालविणे कठीण होईल व ते वाहन असेच धूळ खात पडलेले राहतील म्हणजेच एकप्रकारे ते आपल्या आयुष्यातून निघून जातील व पायी फिरण्याची वेळ मोदी सरकारच्या कृपेमुळे होईल.
यांचा आंदोलनात सहभाग
याप्रसंगी जळगाव जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, जळगाव जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, महानगरध्यक्ष मुजीब पटेल,शहराध्यक्ष शाम तायडे, ज्ञानेश्वर कोळी, मनोज पाटील, सखाराम मोरे,ज्ञानेश्वर महाजन, शरद पाटील, रतीलाल चौधरी, मनोज चौधरी, ऐश्वर्या राठोड, अर्चना पोळ, अमजद पठाण , रमेश शिंपी, प्रदीप देशमुख, रवींद्र जाधव, महेश पाटील, मकसूद पटेल, हर्षल दाणी , फैजन शहा, सारफराज शहा, दीपक कोळी, युसूफ खान, फज्जू शेख, अनिल सोळंखी, देवा ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
नाशिकजवळ पवन एक्स्प्रेसला अपघात : 24 तासानंतर डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्ववत
