एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन : अनिल जैन

यवतमाळ आणि गुजरातच्या आनंद निकेतन शाळेला पहिले पारितोषिक


जळगाव (2 जून 2026) : कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजेंस) जगभरात वेगाने बदल घडवत असली तरी कृषी आणि अन्न-व्यवस्था हे क्षेत्र भविष्यातही तितकेच महत्त्वाचे राहणार एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन घडेल असे प्रतिपादन फालीचे चेअरमन तथा जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी केले.

जळगावातील जैन हिल्स येथे सुरू असलेल्या फाली संमेलनाच्या 12 व्या वर्षाच्या पहिल्या टप्प्यातील पारितोषिक वितरणाप्रसंगी ते बोलत होते. यामध्ये कृषी उद्योगातील बिझनेस प्लॅन सादरीकरण विभागात यवतमाळमधील पीएम रुईकर ट्रस्ट हायस्कूल, नांझा शाळेच्या संघाला पहिले पारितोषिक मिळाले. तर कृषी इन्व्होशन सादरीकरणात अहमदाबादमधील आनंद निकेतन सॅटेलाइट कॅम्पस या शाळेच्या संघाने प्रथम पारितोषिक पटकावले.

अनिल जैन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर भर देण्याचा सल्ला दिला. शिक्षणासोबतच नेतृत्त्वासाठी आवश्यक कौशल्ये आणि दृष्टी विद्यार्थ्यांना देणे हे फालीचे उद्दिष्ट असून, येत्या काही वर्षांत 10 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे ध्येय आहे. भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या प्रवासात कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत निर्णायक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

गेल्या 12 वर्षांपासून फाली उपक्रम विद्यार्थ्यांना शिक्षण, मार्गदर्शन आणि प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देत आहे. जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या प्रेरणादायी कार्याचा उल्लेख करत अनिल जैन यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आवाहन केले. तंत्रज्ञान, शिष्यवृत्ती, इंटर्नशिप आणि स्टार्टअपसाठी आवश्यक पाठबळ आज उपलब्ध असल्याने तरुणांनी भारतीय कृषी व अन्नव्यवस्थेला जागतिक स्तरावर नेण्यासाठी योगदान द्यावे, असेही त्यांनी आवाहन केले. फालीमधील मुलींच्या वाढत्या सहभागाचे कौतुक करत महिला शक्तीची भूमिका देशाच्या विकासात निर्णायक ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी फालीच्या यशस्वीतेसाठी योगदान देणार्‍या विविध अधिकार्‍यांचा तसेच फालीच्या शिक्षक समन्वयकांचा सत्कार करण्यात आला. नवनियुक्त सीईओ शाबोर्नी पोद्दार यांनी पदभार स्वीकारला त्यांचेही स्वागत करण्यात आले. यावेळी भविष्यातील उद्दिष्टांबद्दल शाबोर्नी पोद्दार यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच फालीच्या संस्थापिका तथा उपाध्यक्षा नॅन्सी बॅरी यांनी ही संवाद साधला.

फाली संमेलनाच्या दुसर्‍या दिवशी पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी अभिनव कल्पनांना आणि संशोधनाधारित सादरीकरण केले. 55 कृषी उद्योगावरील बिझनेस प्लॅनचे सादरीकरण करण्यात आले. तसेच 55 कृषी इन्व्होशन चे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केली. या सादरीकरणांमधून विद्यार्थ्यांच्या कृषी क्षेत्रातील नवोन्मेषी विचारांची झलक बघायला मिळाली.

या संमेलनाचा निकाल –

जळगावमधील भालोद शाळेला दोन पारितोषक
कृषी इन्व्होशन सादरीकरण – प्रथम क्रमांक आनंद निकेतन सॅटेलाइट कॅम्पस, अहमदाबाद, दुसरा क्रमांक- न्यू इंग्लीश स्कूल, भालोद, जळगाव, तिसरा क्रमांक- श्री सातपुडा विद्यालय, लोणखेडा, नंदुरबार, चौथा क्रमांक- श्री यमाई श्रीनिवास विद्यालय, औंध, सातारा, पाचवा क्रमांक- न्यू इंग्लिश गर्ल्स स्कूल, आष्टा, सांगली यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

कृषी बिझनेस प्लॅन
प्रथम क्रमांक-पीएम रुईकर ट्रस्ट हायस्कूल, नांझा, यवतमाळ, दुसरा क्रमांक-जनता गर्ल्स हायस्कूल, शेंदूरजना घाट, अमरावती, तिसरा क्रमांक- न्यू इंग्लीश स्कूल-भालोद, चौथा क्रमांक- सोमेश्वर विद्यालय, मुढाळे, पुणे, पाचवा क्रमांक- श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, भिकोबानगर, पुणे यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

आधुनिक तंत्रज्ञान अन् शाश्वत शेतीवर सादरीकरण
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांमध्ये कृषी उद्योजकता, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शाश्वत शेती पद्धती आणि भविष्योन्मुख उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कल्पक सादरीकरणाने उपस्थित परीक्षकांनी आणि तज्ज्ञांनी कौतूक केले. या सादरीकरणांचे मूल्यमापन करण्यासाठी जैन इरिगेशनसह गोदरेज ग्रोवेट, यूपीएल, स्टार ग्री, आयटीसी, ओमनीवर, एसबीआय फाउंडेशन, उज्जीवन, गांधी रिसर्च फाउंडेशन आणि रयत शिक्षण संस्था सातारा अशा नामांकित उद्योग, कृषी व संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञ परीक्षक उपस्थित होते.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !