तरुणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद : नाक-कान-घसा तज्ज्ञांकडून यशस्वी उपचार
जळगाव (बुधवार, 15 जुलै 2026) : सतत डोकेदुखीचा त्रास आणि नाक व कानातून सतत पाण्यासारखा द्रव बाहेर येत असल्याने त्रस्त असलेल्या एका तरूणीवर नाक-कान-घसा (ईएनटी) तज्ज्ञांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला नवजीवन दिले आहे. तपासणीअंती संबंधित तरुणाला सीएसएफ ओटोरिया विथ रायनोरिया हा दुर्मीळ आजार असल्याचे निदान झाले. या आजारामुळे मेंदूभोवती असलेले पाणी नाक व कानावाटे बाहेर वाहत होते. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर हा त्रास पूर्णपणे थांबला असून रुग्णाची प्रकृती आता उत्तम आहे.
अनेक महिन्यांपासून तरुणीला त्रास
35 वर्षीय तरूणीला अनेक महिन्यांपासून डोकेदुखी, नाकातून सतत पाणी येणे तसेच कानातूनही द्रवस्त्राव होण्याचा त्रास होत होता. सुरुवातीला हा साधा सर्दी किंवा कानाचा संसर्ग असल्याचे समजून विविध ठिकाणी उपचार घेण्यात आले. मात्र अपेक्षित फायदा झाला नाही. त्यानंतर डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील नाक-कान-घसा विभागप्रमुख डॉ.अनुश्री अग्रवाल यांनी तरूणीच्या आजाराशी संबंधित आवश्यक तपासण्या केल्या.

विशेष तपासण्यांमध्ये मेंदूभोवतीचे सीएसएफ नाक आणि कानामार्गे गळत असल्याचे स्पष्ट झाले. डॉ. अनुश्री अग्रवाल यांनी रुग्णाला सीएसएफ ओटोरिया रिपेअर ही अत्यंत नाजूक व कौशल्यपूर्ण शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेदरम्यान मेंदूतील पाणी गळती होणारे छिद्र शोधून ते विशेष तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कायमस्वरूपी बंद करण्यात आले. शस्त्रक्रिया यशस्वी ठरली असून रुग्णाच्या नाक आणि कानातून होणारा द्रवस्त्राव पूर्णपणे थांबला आहे. त्याचबरोबर सतत होणार्या डोकेदुखीपासूनही त्याची सुटका झाली आहे. शस्त्रक्रियेसाठी डॉ. पंकज शर्मा, डॉ. शुभम सावकर, डॉ. अंकीता सोलंकी यांनी सहकार्य केले. विशेष म्हणजे ही संपूर्ण शस्त्रक्रिया महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आली.
मेंदूला संसर्ग होण्याचा गंभीर धोका
नाक किंवा कानातून सतत पाण्यासारखा पारदर्शक द्रव बाहेर येत असेल, विशेषतः डोक्याला दुखापत झाल्यानंतर किंवा कोणतेही स्पष्ट कारण नसताना असा त्रास होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. हे मेंदूतील सीएसएफ गळतीचे लक्षण असू शकते. वेळेत निदान आणि योग्य शस्त्रक्रिया केल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. उपचारास विलंब झाल्यास मेंदूला संसर्ग होण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असे डॉ.अनुश्री अक्ष्रवाल म्हणाल्या.
