ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळायलाच हवे
भुसावळात महात्मा फुले समता परीषद आयोजित ‘ओबीसी आरक्षण पे चर्चा’ कार्यक्रमात पदाधिकार्यांचे मत
भुसावळ : स्वातंत्र्याची लढाई ही सर्व ओबीसी बांधवांनी लढल्याने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. आणि आज ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपविण्याचा घाट सुरू आहे. हे कदापी आम्ही होऊ देणार नाही, असे परखड मत अखिल भारतीय महात्मा फुले समता परीषद विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांच्यासह भुसावळ येथील सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकार्यांनी येथे मांडले. भुसावळातील माळी भवनात अखिल भारतीय महात्मा फुले समता परीषदेच्या माध्यमातून ‘ओबीसी राजकीय आरक्षण पे चर्चा’ या बैठकीचे आयोजन शनिवार, 17 रोजी दुपारी 12 वाजता करण्यात आले होते.
यांची प्रमुख उपस्थिती
या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय महात्मा फुले समता परीषद विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांची प्रमुख उपस्थिती होती. धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अशोक नाळे, निरीक्षक आशिष शेलार, सर्वोच्च न्यायालयाचे वकील अॅड.प्रतीक कर्डक, महात्मा फुले समता परीषदेचे जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष वसंत पाटील, युवक जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, राष्ट्रवादीचे प्रा.डॉ.सुनील नेवे, शिवसेनेचे दीपक धांडे, शहरप्रमुख बबलू बर्हाटे, भाजपचे शिशिर जावळे, झेंडूजी महाराज सामाजिक संघटनेचे अध्यक्ष दिनेश भंगाळे उपस्थित होते. प्रास्ताविक महात्मा फुले समता परीषदेचे तालुकाध्यक्ष संतोष माळी यांनी केले.



ओबीसी समाजाला द्यावा न्याय
प्रा.डॉ.सुनील नेवे म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारने उदासीनता झटकून एकत्र येऊन ओबीसी राजकीय आरक्षणात सहकार्य केले पाहिजे तसेच उपलब्ध इंपेरीकल डेटा वर काम करून ओबीसी समाजास त्वरीत न्याय द्यावा. भाजपचे शिशिर जावळे यांनी ओबीसी समाजाला आता खर्या अर्थाने जागवायची वेळ आल्याचे सांगितले. शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपक धांडे यांनी सांगितले की, ओबीसी समाजाचं राजकीय अस्तित्व धोक्यात आणू पाहणार्या प्रवृत्तींना शिवसेना स्टाईल उत्तर देण्यात येईल शिवाय आरक्षण मिळणारच आहे.
ओबीसीचे राजकीय नेतृत्व संपविणारे कितीही विद्वान पंडित अडथळे आणो.. आमच्या अंगावर आल्यास शिंगावर घेऊ, असा इशाराही संत झेंडुजी महाराज बेळीकर लेवा पाटीदार युवक मंडळ भुसावळचे अध्यक्ष दिनेश भंगाळे यांनी दिला.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
या कार्यक्रमाला अॅड.सागर सरोदे, वसंतराव कोलते, एस.टी.महामंडळ युनियन लीडर धर्मराज देवकर, किशोर पाटील, सचिन बराटे, गिरीश पाटील, सागर वाघोदे, संजय बराटे, महालक्ष्मी ग्रुप भुसावळचे सर्व पदाधिकारी तसेच कैलास बंड, माळी महासंघाचे भुसावळ तालुकाध्यक्ष विजय माळी, वरणगाव शहर अध्यक्ष सचिन माळी, गजानन माळी, सुधाकर माळी आदी उपस्थित होते. आभार प्राचार्य धीरज पाटील यांनी मानले.

