बोहर्डीच्या शेतकर्‍याचा शेतात विजेचा धक्का लागल्याने मृत्यू


भुसावळ : तालुक्यातील बोहर्डी येथील शेतकर्‍याचा शेतात विद्युत तारेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. रविवारी दुपारी अडीच वाजता घटना घडली. भास्कर रामचंद्र सावळे (52, रा.बोहर्डी) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे.

तार हटवताच लागला जबर शॉक
महामार्गालगत बोहर्डी शिवारात हॉटेल सहेलीच्या मागील बाजूस भास्कर सावळे यांनी बटाईने शेत कसले होते. मका पेरल्यानंतर त्यांनी रविवारी कोळपणीचे काम सुरू केले असता शेतातून गेलेल्या वीज वाहिनीच्या डमी लाईनचा तुटलेला तार बाजूला करताना शेतकर्‍यास शॉक लागला व त्यांचा मृत्यू झाला. सुमारे दीड तासानंतर ही घटना उघडकीस आली. याबाबतची माहिती वरणगाव पोलीस व विज वितरण कंपनीला देण्यात आली परंतु वीज वितरण कंपनीचे कर्मचारी या ठिकाणी आले नाही यामुळे संतप्त नागरीकांनी काही वेळ रास्ता रोको केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे, हवालदार अतुल बोदडे यांनी नागरीकांची समजूत काढल्यानंतर व विजपुरवठा खंडीत केल्यानंतर या घटनेचा पंचनामा करण्यात आला. मयत शेतकर्‍याचा मृतदेह वरणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !