कृषिमित्र स्व.हरिभाऊ जावळे यांच्या संकल्पातील अपूर्ण कामांची पूर्तता करणार !

रावेर लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा निश्चय

0

रावेर : रावेर मतदारसंघासाठी वरदान ठरणारा माजी खासदार कृषिमित्र स्व.हरिभाऊ जावळे यांच्या संकल्पनेतील मेगा रिचार्ज प्रकल्प गेल्या दहा वर्षात पूर्ण झाला नाही याशिवाय त्यांच्या संकल्पनेतील अनेक प्रोजेक्ट भावी काळात आपण पूर्ण करण्याचा निश्चय केल्याची माहिती रावेर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) गटातील उमेदवार श्रीराम पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

दहा वर्षात रखडलेल्या प्रकल्पांना चालना देणार !
माजी खासदार कृषिमित्र स्व.हरिभाऊ जावळे यांनी त्यांच्या कारकिर्दीत रावेर लोकसभा मतदारसंघातील शेतकर्‍यांच्या हिताच्या व जनतेच्या विकासासाठी प्रयत्न केले होते. यासाठी त्यांनी काही महत्वाकांक्षी योजना हाती घेतल्या होत्या. रावेर मतदार संघातील रावेर, यावल, चोपडा या तालुक्यातील शेतीच्या सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी त्यांनी मेगा रिचार्ज प्रकल्प हाती घेतला होता मात्र त्यानंतरच्या दहा वर्षाच्या काळात या प्रकल्पासाठी लोकप्रतिनिधींनी फारसा पाठपुरावा केला नाही, असदेेखील ते म्हणाले.

शेतकरी हिताचे प्रकल्प तडीस नेणार
रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर हे केळी उत्पादन करणारे तालुके आहेत मात्र या भागात केळीवर प्रक्रिया करणारे उद्योग उभे करण्यासाठी स्व.जावळे यांचा प्रयत्न होता शिवाय रावेर, सावदा, निंभोरा रेल्वे स्टेशनवर अनेक प्रवासी गाड्यांना थांबा मिळावा, अशी प्रवाशांची मागणी आहे. गेल्या दहा वर्षात या मागणीची पूर्तता होऊ शकली नाही. केळी रेल्वे वॅगनचा प्रश्न तसाच कायम आहे. रेल्वेतर्फे केळी उत्पादक शेतकर्‍यांना केळी वॅगन भाड्यात दिल्या जाणार्‍या सूटचा प्रश्न सुटलेला नाही. असे शेतकरी हिताचे तसेच जनतेच्या विकासाचे अनेक प्रकल्प अद्यापही कायम आहेत. स्व.हरिभाऊ जावळे यांचे संकल्पनेतील विकासाचे अपूर्ण राहिलेले प्रकल्प, त्यांनी केलेला संकल्प भावी काळात आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील म्हणाले.


कॉपी करू नका.