गुरुच्या सिद्धांतांना आचरणात आणणे हीच गुरूंना खरी वंदना : जनार्दन महाराज


फैजपूर : प्रपंचात यशस्वी होण्यासाठी इतरांचा आपल्यावर असलेला विश्वास सांभाळणे अत्यंत आवश्यक आहे. भक्ती करताना संशय कुतर्क करू नये. निःसंशय आणि निरंतर धर्मसेवा, राष्ट्रसेवा केल्यास आपण आपल्या धर्मास राष्ट्रास परमोच्च शिखरावर पोहोचू शकतो. अज्ञानात व विकार वासनांमध्ये बांधलेले मन जोपर्यंत मुक्त करणार नाही तोपर्यंत स्वतःला सिद्ध करू शकणार नाही, मग त्याशिवाय मोक्ष मुक्ती शक्य कशी होईल ? असा प्रश्न महामंडलेश्वर जनार्दन महाराजांनी उपस्थित केला. एकलव्य आणि भक्त मीराबाई यांच्या गुरु साधनेच्या दृष्टांतातून गुरुवरील भाव, अढळ श्रद्धा, निःसंशय भक्ती आणि अखंड साधना असल्यास जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये समाधानी असले पाहिजे, हे समाधानच मोक्ष असल्याचे महामंडलेश्वर म्हणाले. गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने श्री सतपंथ मंदिर संस्थान,

गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांना आर्शीवचन
फैजपूर येथे रविवारी सकाळी महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. महापूजेनंतर येथून जवळव असलेल्या वढोदा, ता.यावल येथील निष्क्रलंक धाम हेल्थ केयर सेंटर या ठिकाणी गुरुवाणी सत्संग व गुरुदर्शनाचा महोत्सव झाला. महोत्सवच्या प्रारंभी अक्षरनिवासी सदगुरु शास्त्री खान्देशरत्न भक्तीकिशोरजी महाराज यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नंतर वैदिक मंत्रोच्चारात पंडित श्रीकांतजी रत्नपारखी यांनी सपत्नीक गुरूपाद्य पूजन केले. त्यानंतर गुजरात येथून आलेल्या भाविकांनी गुरुपूजन केले.

समाधानाचे कारण बना
महामंडलेश्वर म्हणाले की, परमेश्वर आपल्याला जसे आनंदाची प्राप्ती करून देतो व आपण त्याचा आनंदाने स्वीकार करतो त्याच प्रकारे जीवनातील दुःख संघर्षाची स्थिती सुद्धा आनंदाने स्वीकारली पाहिजे. परमार्थ आणि संसाराचा बॅलन्स सांभाळावा कारण ही एक साधनाच आहे. गुरु शिष्याचं नातं हे सर्जनशील असतं त्यातून नव्याचा उदय होतो म्हणून उत्तम शिष्य बनून आनंदाचा आणि समाधानाचं कारण बनलं पाहिजे.

गुरु हे स्वयं ब्रह्मरूप
श्री एकदंत महाराज म्हणाले की, ब्रह्म जाणणारा तो ब्रह्म असून गुरु हे स्वयं ब्रह्मरूप असतात आणि या गुरुच्या सिद्धांतांना आचरणात आणणे ही गुरूंना खरी वंदना ठरते. परिस केवळ लोखंडाला सोनं करतो तर गुरु हे शिष्याला आपल्यासमान बनवतात इतके ते महान असतात. सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित केलेल्या ’जागर संस्कृतीचा आनंद भक्ती गीतांचा’ या कार्यक्रमातून उभारलेला निधी हा वढोदा येथील श्री विठ्ठल-रुखमाई व निष्कलंक नारायण मंदिरासाठी वढोदा येथील महिला भजनी मंडळ यांना सुपूर्द करण्यात आला. पंचक्रोशीतुन व गुजरात तसेच मध्यप्रदेशातून आलेल्या हजारो भाविकांनी गुरु दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !