बदलापूर अत्याचार प्रकरण : शाळेचे ट्रस्टी पोलिसांच्या जाळ्यात

बदलापूर (03 ऑक्टोबर 2024) : चिमुकल्या मुलींवर अत्याचार प्रकरणानंतर बदलापूरात संतप्त नागरिकांनी आंदोलन केले तर या घटनेतील आरोपीचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला होता. या गुन्ह्यातील सहआरोपी शाळेचे ट्रस्टी तुषार आपटे आणि उदय कोतवाल हे पसार झाल्यानंतर त्यांचा शोध सुरू असताना यंत्रणेने त्यांना अटक केली. बदलापूर घटनेच्या दीड महिन्यानंतर ठाणे क्राइम ब्रांचने दोघांना ताब्यात घेत त्यांना एसआयटी टीमकडे सोपवले जाणार असल्याचे सांगितले.
कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला
विशेष म्हणजे उच्च न्यायालयाने या दोन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. शिवाय आरोपींना अटक करण्यात सुरू असलेल्या दिरंगाईवरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि पोलिसांवर कडक शब्दात ताशेरेही ओढले होते. अखेर या दोन्ही आरोपींना ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कर्जत परिसरातून ताब्यात घेतले आहे. दोघांनाही आज कल्याण कोर्टात हजर केले जाणार आहे.
सव्वा महिन्यानंतर पोलिसांच्या ताब्यात
या दोघांना राजकीय वरदहस्त असल्याचे आरोप केले गेले होते. शाळेत घडलेला प्रकार पोलिसांना न कळवणे, पुरावे नष्ट करणे असे या दोघांवर आरोप होते. तेव्हापासून ते आजपर्यंत म्हणजे जवळपास सव्वा महिना हे दोघे फरार होते. सहआरोपी भाजपशी संबंधित असल्याचा विरोधक आरोप करत होते.
मुख्य आरोपी गोळीबारात ठार
मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी तत्काळ अटक केली मात्र त्याने पोलिसांकडील बंदुक हिसकावल्यानंतर गोळीबार केला व प्रत्त्युत्तरात झालेल्या गोळीबारात शिंदे हा मारला गेला. शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांना याच प्रकरणात अटक झाली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयाने जामीनही मंजूर केला होता.
