वरणगावात नागेश्वर मंदिराजवळ उड्डाण पूल उभारावा


रेल्वेमंत्री वैष्णवजी व रावसाहेब दानवे पाटील यांना निवेदन

वरणगाव : शहरातून बोदवडला जाण्यासाठी तीर्थक्षेत्र नागेश्वर मंदिराजवळ रेल्वे क्रॉसिंग वर उड्डाणपूल उभारावा तसेच सिद्धेश्वर नगर येथे जाण्यासाठी अस्तिवात असलेल्या रेल्वे पुलाखाली भुयारी मार्ग करावा तसेच वरणगाव रेल्वे स्टेशनवर आरक्षण खडकी सुरू करावी, डाऊन महाराष्ट्र एक्सप्रेसला व मुंबई अमरावती एक्सप्रेसला वरणगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावा, अशी मागणी रेल्वे मंत्री अश्विनी कुमार वैष्णवजी व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे दिल्ली येथे करण्यात आली. डॉ.राजेंद्र फडके यांच्या माध्यमातून झालेल्या भेटीप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, शहर उपाध्यक्ष हितेश चौधरी, भाजयुमो सरचिटणीस आकाश निमकर उपस्थित होते.

उड्डाणपूल उभारण्याची मागणी
यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी भेटी दरम्यान मंत्री महोदयांना बोदवडकडे जाण्यासाठी नागेश्वर मंदिराजवळ असलेला पुल अत्यंत छोटा असल्याचे सांगत भरधाव वाहने जाऊ शकत नसल्याने जनतेचे वर्षानुवर्षे पासून हाल होत असल्याचे सांगितले शिवाय या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाण पूल होणे अति आवश्यक असल्याने उड्डाणपूल उभारण्याची मागणी केली. सिद्धेश्वर नगराकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यांच्या मधोमध एक रेल्वेपूल असून या पुलाखाली पावसाचे पाणी पडल्यानंतर मोठ्या-प्रमाणात पाणी साचल्याने असल्याने नागरीक व रहिवाशांना ये-जा करता येत नाही आणि गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागतो, असेही प्रसंगी काळे यांनी मंत्री महोदयांना पटवून दिले. यावेळी वरणगाव रेल्वे स्टेशनवर रेल्वे महाराष्ट्र एक्सप्रेसला, अमरावती एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी करण्यात आली व भुसावळ-अकोला शटल सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रस्ताव मागून त्वरीत दखल घेण्यात येईल, असे आश्‍वासन दोघा मंत्र्यांनी दिले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !