आगामी निवडणुकांसाठी कामाला लागा ; जनतेपर्यंत शासन योजनांची माहिती पोहोचवा


भुसावळातील भाजपच्या बैठकीत खासदार रक्षा खडसे यांचे आवाहन

भुसावळ : पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी बुथ समिती पूर्णपणे गठीत असणे आवश्यक असून या समितीच्या माध्यमातूनच आगामी निवडणूका आपल्याला जिंकायच्या आहे, त्यासाठी समितीच्या कार्यकर्त्यांनी घरेाघरी जाऊन पक्षाची व केंद्रातील योजनांची माहिती पोहोचवावी, असे आवाहन खासदार रक्षा खडसे यांनी येथे करीत कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आवाहन केले. लोणारी हॉलमध्ये गुरूवारी दुपारी भारतीय जनता पार्टीच्या शहर व ग्रामीण बुथ व शक्ती केद्र प्रमुखांची बैठक झाली. याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे होते.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर आमदार संजय सावकारे, बेटी बचाव बेटी पढावचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे, डॉ.नि.तु.पाटील, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, उपनगराध्यक्षा सोनी संतोष बारसे, पंचायत समिती सभापती वंदना उन्हाळे, उपसभापती प्रीती पाटील, सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, दिलीप कोळी आदी व्यासपीठावर होते, यावेळी शहराध्यक्ष बर्‍हाटे यांनी प्रास्ताविक करीत पक्षाचा शहरातील कामांची माहिती दिली. पक्षाची यापूर्वीची परीस्थिती म्हणजे मालिक तो दिलदार है लेकीन चमचोसे परेशान है अशी कोपरखळी मारल्याने उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.




डॉ.फडके म्हणाले, कुणाच्या येण्या-जाण्याने फरक पडत नाही
डॉ.फडके यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले की, पक्षात आयाराम गयाराम झाले असले तरी पक्षाला काहीही फरक पडत नाही, त्यामुळे प्रत्येकाने पक्षाच्या कामाला लागावे, पक्षाकडून राबविण्यात येणार्‍या योजना या जनतेपर्यत पोचविण्याचे काम आपले आहे, त्यासाठी आपसातील मतभेद विसरून प्रत्येकाने कामे करावे. जिल्हाध्यक्ष भोळे यांनी पक्ष मजबुत करण्यासाठी प्रत्येकाने आता कामाला लागावे, असे आवाहन केले.
बैठकीला पक्षाचे राजेद्र चौधरी, युवराज लोणारी यांच्यासह पक्षाचे सर्वच नकरसेवक, पदाधिकारी, बुथ समिती प्रमुख यांची उपस्थिती होती.

पक्षाची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहोचवा : आमदार
आमदार संजय सावकारे म्हणाले की, पक्षाची ध्येय धोरणे, केंद्र सरकारच्या योजना या तळागाळातील नागरीकांपर्यंत पोहोचणे गरजेचे असून या माध्यमातून पक्ष मजबूत होईल. प्रत्येक पदाधिकार्‍यांनी गोर-गरीब लोकांची कामे करून द्यावी, किरकोळ कामांसाठी नागरीकांना भटकंती करावी लागते ती थांबली पाहिजे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !