शेतकर्यांना पीक विम्याची रक्कम न देणार्या बँकावर गुन्हे दाखल करा : खासदार रक्षा खडसेंची मागणी
मुक्ताईगनर : जळगाव येथे सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत खासदार रक्षा खडसे यांनी ज्या बँकांनी पीक विम्याची रक्कम शेतकर्यांना अदा केलेली नाही, अशा बँकांवर तत्काळ दाखल करण्याची मागणी केली तसेच फेब्रुवारी महिन्यात झालेल्या वादळी पावसामुळे रावेर, यावल भागातील नुकसान झालेल्या घर मालकांना अजूनही मदत मिळाली नसल्याने ही मदत का नाही मिळाली? असा प्रश्न उपस्थित केला.
महावितरणच्या आडमुठ्या धोरणाबाबतही वेधले लक्ष
आज शेतकर्यांचा खरीप हंगाम बहरलेला असताना काही ठिकाणी महावितरणचे अधिकारी वीज बिल भरणा केलेला असताना सुद्धा जोडणी खंडित करीत असल्याचे महावितरण अधिकार्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले तसेच दोन दिवसांपूर्वी भुसावळ रेल्वे मंडळ अधिकारी यांच्याशी पॅसेंजर रेल्वे सुरू करण्या संदर्भात चर्चा झाली असता त्यांनी या संदर्भात महाराष्ट्र शासनाशी बोलावे लागेल, असे सांगितले असता आज रक्षा खडसे यांनी पालकमंत्री गुलाबरवजी पाटील यांनी महाराष्ट्र शासनाशी या संदर्भात बोलणे करावे अशी विनंती केली. तसेच काही ठिकाणी रेल्वे पुलांखाली साचणार्या पाण्या संदर्भात सुध्दा प्रश्न उपस्थित करण्यात आला.



यांची व्यासपीठावर उपस्थिती- याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रंजनाताई पाटील, खासदार रक्षाताई खडसे, माजीमंत्री तथा आमदार गिरीश महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधिक्षक डॉ प्रवीण मुंढे, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील आदी उपस्थित होते.

