भुसावळातील सत्ताधार्यांनो दर्जेदार कामे करा अन्यथा राजीनामे द्या : विवेक नरवाडे
भुसावळ : भुसावळ पालिकेचे नगराध्यक्ष तसेच सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी येत्या आठ दिवसात शहरातील विविध प्रलंबित विकासकामांना सुरुवात करावी शिवाय दर्जेदार पद्धत्तीने कामे करावीत अन्यथा पदांचे राजीनामे द्यावेत, अशी मागणी जळगाव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. या मागणीला सत्ताधारी भाजपने प्रतिसाद दिला नाही तर नगरपरीषदेचे काम बंद पाडण्यात येईल, असा इशाराही नरवाडे यांनी दिला आहे.
सत्ताधार्यांच्या कामाला जनता वैतागली
नरवाडे यांच्या पत्राचा आशय असा की, भुसावळ नगरपालिकेत भाजपाची सत्ता आहे. सत्ताधारी भाजपचा मनमानी व भ्रष्टाचारी कारभार सुरू आहे. पालकमंत्री यांनी आदेश दिल्यानंतर केवळ मुरूम टाकून रस्त्यांची डागडूजी केली जात आहे. शासनाचा निधी उपलब्ध नाही, असे सांगून जनतेला वेठीस धरण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे आणि ही बाब अत्यंत चुकीची आहे.शासनाचा निधी उपलब्ध असलेली विकासकामे सुरू करण्याबाबत येत्या आठ दिवसांच्या आत आवश्यक ते ठराव मंजूर करून कामाचे आदेश काढावेत, अशी मागणीही नरवाडे यांनी केली आहे.




