भुसावळात एकाचवेळी तिघांची निर्घृण हत्या
कंडारीतील जुन्या वादातून दोघांची तर कुविख्यात गुन्हेगार निखील राजपूतची कौटूंबिक वादातून हत्या
Brutal killing of three at the same time in Bhusawal भुसावळ : भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावंडांची निर्घृण हत्या करण्यात आली तर त्याच्या काहीच वेळेनंतर भुसावळात पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुविख्यात गुन्हेगार निखील राजपूतची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब शनिवारी पहाटे उघडकीस आल्यानंतर जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, कंडारीतील खुनानंतर आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी नातेवाईक संतप्त झाले होते. दोन्ही वेगवेगळ्या घटनेतील आरोपींना अटक करण्यात यंत्रणेला यश आले आहे.






कंडारातील भावंडांची हत्या
भुसावळ तालुक्यातील कंडारी गावातील शांताराम भोलानाथ साळुंखे (33) व राकेश भोलानाथ साळुंखे (28) यांची जुन्या वादातून चाकू, तलवार व लोखंडी रॉड डोक्यात मारून निर्घृण हत्या करण्यात आली तर या हल्ल्यात या रमेश अमोल इंगळे (32, सर्व रा.कंडारी) हे व विकी साळुंखे (30) हे जखमी झाले असून त्यांच्यावर ट्रामा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
कुविख्यात गुन्हेगार निखीलचा शालकानेच केला खून
पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुविख्यात गुन्हेगार निखील राजपूतचा अनैतिक संबंधातून शालक निलेश ठाकूर यानेच चाकूचे सपासप वार करीत खून केला. ही घटना शनिवारी पहाटे दोन वाजता श्रीराम नगरातील पाण्याच्या टाकीवर घडली. निखील राजपूत याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते व ही बाब निखीलचा शालक निलेश ठाकूर याला खटकत होती. शनिवारी रात्री निखील भुसावळात आल्यानंतर पाण्याच्या टाकीवर त्याचे शालक निलेशशी वाद झाले व त्यातून त्याने चाकूचे गळ्यावर व मानेवर वार झाल्याने मृत्यू झाला.
पोलीस अधिकार्यांची धाव
खुनाची घटना समोर आल्यानंतर जळगाव पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, एलसीबी पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील, भुसावळ शहरचे पोलीस निरीक्षक गजानन पडघण व बाजारपेठचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोलीस कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.


