जळगाव लोकसभेच्या पहिल्या महिला खासदार म्हणून स्मिताताई वाघ यांना संधी द्या : आमदार मंगेश चव्हाण
दहा वर्ष आमदार-खासदार राहिल्यानंतर काय केले : विरोधकांचा घेतला खरपूस समाचार
चाळीसगाव : महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ पोहोरे येथे महायुतीचा बहाळ-कळमडू गटाचा मेळावा हजारो पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामस्थ मंडळी यांच्या उपस्थितीत शनिवारी झाला. यावेळी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी आपल्या भाषणातून विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले की, नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे या मेळाव्याला भव्य अश्या सभेचे स्वरूप प्राप्त झाले. खर म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कामाची पावती दर्शवणारी ही उपस्थिती होती. आज काही मंडळींकडून शेतकरी, दूध उत्पादक यांच्या नावाआड लपून राजकारण केलं जातं आहे. मात्र 10 वर्ष ते आमदार, खासदार होते त्यांनी हे प्रश्न सोडवण्यासाठी काय केलं?, याच उत्तर आधी त्यानी द्यावे. त्यांनी बेलगंगा, बलून बंधारे, गणित नगरीच्या नावाने जनतेला मूर्ख बनवण्याचे काम केले. 2014 मध्ये तुम्ही ज्यांचे बाप काढले, तीन पिढ्या काढल्या त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसत आहात मात्र जनता या भूलथापांना आता बळी पडणार नाही.
ही गल्लीची निवडणूक नाही तर दिल्लीची निवडणूक आहे. जनता मोदीजींच्या पाठीमागे आहे त्यामुळे येणार्या 13 तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटण दाबून स्मिताताई वाघ यांना जळगाव लोकसभेच्या पहिल्या महिला खासदार म्हणून निवडून द्यावे, असे आवाहनही आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी केले.
यावेळी पोहोरे व परिसरातील 200 हुन अधिक उबाठा गट, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी भाजपात स्वागत केले.