राऊतांकडून सीएम फडणविसांचे कौतुक : फिक्सरची नावे पाठवणारे 13 मंत्री शिंदेंचे,

मुंबई (25 फेब्रुवारी 2025) : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत विविध कारणांनी नेहमीच चर्चेत असतात व सत्ताधार्यांवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत मात्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुती सुमने उधळत त्यांचे कौतुक केले आहे. ओएसडी म्हणून फिक्सरची नावे पाठवणारे 13 मंत्री शिंदेंचे असून त्यांची नावे जाहीर करणार असल्याचे राऊत म्हणाले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचे स्वागत
माझ्याकडे 125 नावे आली असून त्यातील 109 नावांना मंजुरी दिली आहे. उर्वरित नावांना मी मंजुरी दिली नाही. मंत्रालयात त्यांच्याबद्दलचे मत फिक्सर असं आहे. कोणी नाराज झालं तरी ही मी अशा नावांना मान्यता देणार नाही, अशी रोखठोक भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. या भूमिकेचे खासदार संजय राऊत यांनी स्वागत केले. त्याचबरोबर ही नावे पाठवणारे शिंदे गटाचे आहेत, असा स्फोटक दावा राऊत यांनी केला.
‘ती नावे तुम्ही जाहीर करा’
संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मंत्र्याला दम देताना सांगितले आहे की, ओएसडी आणि पीए नियुक्तीसंदर्भात जी यादी आली मंत्र्यांकडून त्यातील 16 जण दलाल आणि फिक्सर होते. माझं मुख्यंमत्र्यांना आणि राज्याच्या मुख्य सचिवांना आवाहन आहे की, कोणत्या मंत्र्याने आपला ओएसडी किंवा पीए म्हणून अशा फिक्सरची नावे पाठवली होती, ती तुम्ही जाहीर करा. महाराष्ट्राच्या हितासाठी, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली.
हे कोण फिक्सर आहेत? हे जे दलाल, फिक्सर आहेत, त्यांची जी नावे पाठवली, माझ्या माहितीप्रमाणे हे सर्व मंत्री शिंदे गटाचे आहेत. म्हणजे शिंदेंच्या पक्षाचे. शिंदेंचा पक्ष हा अमित शाहांचा पक्ष आहे. हे सगळे शिंदे गटाच्या मंत्र्यांकडून गेले, असा दावा संजय राऊत यांनी केला.
माझ्याकडे 16 जणांची नावे आहेत : खासदार संजय राऊत
खासदार राऊत पुढे बोलताना म्हणाले की, मी नावे देईन. माझ्याकडे 16 जणांची नावे आहेत. यात 13 शिंदेंचे आहेत आणि उरलेले अजित पवार गटाचे आहेत. मी मागेही म्हटलो होतो की, अजित पवारांना त्यांच्या मर्यादा माहिती आहेत. अजित पवार पाप धुवायला, प्रयागराजला गेले नाहीत. त्यांना माहिती आहेत की महाराष्ट्रात पाप धुवायला नद्या आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
फडणवीसांचं अभिनंदन
या सगळ्यांचे फिक्सर ओएसडी आणि पीए होते, त्यांना रोखल्याबद्दल आणि महाराष्ट्राचं संभाव्य नुकसान टाळल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो. अत्यंत कठोर निर्णय ते घेत आहेत. जरी आमच्यात राजकीय मतभेद असले, तरी राज्याच्या हिताच्या अशा निर्णयाला आम्ही पाठिंबा देतो.
