सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम लढणार !
सरकारकडून विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती; देशमुख कुटुंबीयांची मागणी मान्य

मुंबई (26 फेब्रुवारी 2025) : राज्यात गाजत असलेल्या बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती राज्य सरकारने केली आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत याबाबत माहिती दिली आहे.
आंदोलनाची सरकारकडून दखल
संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी आपल्या विविध मागण्यासाठी मस्साजोग येथे ग्रामस्थांसोबत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. प्रमुख मागण्यांमध्ये उज्ज्वल निकम यांची सरकारी वकिल म्हणून नियुक्ती करण्याची मागणी होती. त्यानुसार आता राज्य सरकारच्या वतीने ही मागणी मान्य करण्यात आली आहे.
या संबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून तर अॅड.बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली.
राज्य सरकारच्या वतीने उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीचे सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी स्वागत केले आहे. वकिल म्हणून त्यांचे काम खूप मोठे आहे. ते एक चांगले विधिज्ञ आहेत. तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे या निर्णयाचे स्वागतच करायला हवे, असे देखील अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. मात्र ही साधी मागणी मान्य करण्यासाठी आंदोलन करावे लागले, हे दुर्दैव असल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे.
- आंदोलन करणार्या ग्रामस्थांच्या सात प्रमुख मागण्या
- तत्कालीन पीआय प्रशांत महाजन, फौजदार राजेश पाटील यांना बडतर्फकरून सहआरोपी करावे
- फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करावी
- विशेष सरकारी वकील म्हणून अॅड.उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी.
- प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे
- वाशी पोलिस ठाण्याचे पीएसआय घुले, कॉन्स्टेबल दिलीप गित्ते, गोरख फड, दत्ता बिक्कड यांचे सीडीआर तपासून त्यांना सहआरोपी करावे
- आरोपींना मदत करणार्यांवर कारवाई करावी
- संतोष देशमुख यांचामृतदेह केजऐवजी कळंबकडे नेण्यामागचे कारण शोधावे, दोषींना समोर आणावे
