अवयव दान ही पुनर्जन्माची संधी : निलेश गोरे


भुसावळ (26 फेब्रुवारी 2025) : एक व्यक्ती अवयवदान करून अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचवू शकतो. मृत्यूनंतर हृदय, यकृत, मूत्रपिंडे, फुफ्फुसे, स्वादुपिंड, आतडे, त्वचा, हाडे आणि कॉर्निया हे अवयव प्रत्यारोपणासाठी उपयोगी ठरू शकतात. भारतात अजूनही अवयवदानाबाबत जागरूकतेचा अभाव आहे त्यामुळे अधिकाधिक लोकांनी पुढे येऊन अवयवदानाची शपथ घ्यावी, असे आवाहन मानसशास्त्रीय समुपदेशक निलेश गोरे यांनी केले.

स्वातंत्र्यवीर वीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शासकीय आय.टी.आय.मध्ये नेत्रदान, रक्तदान आणि अवयवदान जनजागृतीसाठी विशेष समुपदेशन कार्यक्रम झाला. निलेश गोरे म्हणाले की, नेत्रदान हे अत्यंत सोपे आणि महत्त्वाचे दान आहे कारण एका दात्याच्या नेत्रदानातून दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. दात्याच्या मृत्यूनंतर सहा तासांच्या आत डोळे संकलीत केले जातात त्यामुळे मृत्यूपूर्वी इच्छापत्र भरून नेत्रदान करण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

हा मानवतेचा निर्णय
अवयवदान प्रक्रियेत ब्लड ग्रुप मॅचिंग, साठवणुकीसाठी वापरण्यात येणारी विशेष द्रव्ये आणि ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून जलद वाहतूक यांचे महत्त्व पटवून देण्यात आले. अवयवदान करणार्‍या कुटुंबीयांना सामाजिक सन्मान मिळतो परंतु हा पूर्णतः नि:स्वार्थ आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून केला जाणारा निर्णय आहे, असे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी अवयवदान आणि नेत्रदान करण्याचा संकल्प केला. प्राचार्य एस.एम.राजपूत, वरिष्ठ गटनिदेशक आय.आर.मोरे, दिवाकर भिरुड, एल.आर.पाटील, दीक्षा गाढे मॅडम सूत्रसंचालन केले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !