जिद्दीसह मेहनतीच्या जोरावर तुम्हीही होवू शकता आय.एस. वा आयपीएस


रावेर येथे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे : नागझिरी चौक विश्रामगृहाचे उद्घाटन

रावेर : कुठलेही ध्येय साध्य करण्यासाठी जिद्द व मेहनत घेतल्यास कुठल्याही क्षेत्रात हमखास यश मिळते व सर्वसाधारण कुटुंबातील मुलगा सुध्दा उच्च पदावर काम करू शकतो यासाठी तुम्ही तयार असायला हवे, असे मत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनप्रसंगी व्यक्त केले. शुक्रवारी रावेर पोलिस स्टेशनची वार्षिक तपासणीसाठी डॉ.मुंढे रावेर आले असता त्यांनी पोलिस स्थानकाच्या विविध विभागाची पाहणी केली त्यानंतर नागझिरी चौक विश्राम कक्षाचे उद्घाटन केले तसेच पोलिस कवायत मैदानावर पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन केले व उपस्थित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संखने विधार्थी उपस्थित होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी रावेरचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, सहा.पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक, निंभोर्‍याचे सहा.निरीक्षक स्वप्नील उनवणे, पोलिस उप निरीक्षक मनोज वाघमारे, मनोहर जाधव आदी उपस्थित होते.


जिद्द व मेहनतीच्या जोरावर निश्‍चित मिळेल यश
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.मुंढे म्हणाले की, जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर तुम्ही पोलिस शिपाई काय आयएएस, आयपीएस कोणतेही पद तुम्ही मिळवु शकता. सध्या सरकारी नोकरी मिळणे खूप दुर्मीळ झाले असून मी स्वत: एक सर्व साधारण कुटुंबातील असून माझे वडील प्राथमिक शिक्षक होते तर आई गृहिणी आहे. माझा चुलत भाऊ सुध्दा आयपीएस असून त्याचे आई-वडील सुध्दा शेतकरी आहेत. आमच्या दोघांचे शिक्षण गाव-खेड्यात झाले. माझा 2003 मध्ये नवी मुंबईत एमबीबीएसला नंबर लागला त्या नंतर मी 2009 मध्ये मध्ये दिल्लीला आय-आयपीएसच्या तयारीसाठी गेलो. तेथे 2010 ची लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन मी पहिल्याच प्रयत्नात आयपीएस झालो. या पदापर्यंत पोहचण्यासाठी मी सण-वार, उत्सव सर्व सोडून किमान दहा ते बारा तास सतत अभ्यास करायचो त्यामुळे रडत बसण्यापेक्षा आताच्या मुलांनी ध्येय मोठे ठेवून परीस्थितीला सामोरे जावे, असे आवाहनही त्यांनी केले. दरवर्षी भारतभरात सुमारे एक हजार पदासाठी लोकसेवा आयोग परीक्षा घेते त्यासाठी आपण तयार असायला पाहिजे, असे डॉ.मुंढे म्हणाले.

जिल्ह्यात 250 जागांसाठी होईल पोलिस भरती
आगामी पोलिस भरतीमध्ये आधी ग्राउंड घेतले जाईल त्यानंतर ग्राउंडमध्ये उत्तीर्ण होणार्‍या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. जळगाव जिल्हात किमान 250 जागांसाठी पोलिस भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे, डॉ.मुंढे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, 2019 मध्ये 190 जागांचा प्रस्ताव पाठवला होता परंतु यावर्षी तो वाढवून 250 असेल त्यामुळे जास्तीत-जास्त तरुणांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !