मोठा निर्णय : शासकीय अधिकार्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यास अनुकंपा नोकरी
राज्य मंत्री मंडळाचा महत्त्वाचा निर्णय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राज्यातील अधिकार्यांना मोठा दिलासा
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व अधिकार्यांना मोठा दिलासा दिला आहे. सध्या शासकीय सेवेतील एखाद्या गट क किंवा गट ड कर्मचार्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्याला अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात येते. आज राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे की, गट अ आणि गट ब मधील अधिकार्यांच्या बाबतीतदेखील हे अनुकंपा धोरण लागू करावे. कोविड परीस्थितीत अनेक अधिकार्यांचे निधन झाले असून अधिकारी संघटनांचीदेखील हे अनुकंपा धोरण लागू करण्याची मागणी होती. मुख्यमंत्र्यांनी या मागणीप्रमाणे कार्यवाही करण्याची सूचना केली होती. त्या अनुषंगाने आज यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आणण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील अधिकार्यांच्या निधनामुळे ओढवणार्या आर्थिक आपत्तीतून त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अ वा ब गटातील अधिकार्यांचे निधन झाल्यानंतरही अनुकंपा नोकरी
गट अ किंवा गट ब मधील अधिकार्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास गट क किंवा गट ड मध्ये अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात येईल. याशिवाय अनुकंपा नियुक्तीसाठीचे विविध आदेश एकत्रित करून महाराष्ट्र राज्य शासन अनुकंपा नियुक्ती नियम 2021 तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे, यामुळे अनुकंपा संदर्भातील प्रशासकीय अडचणी दूर होतील.




