रावेर तालुक्यात लााभार्थी स्वस्त धान्यापासून वंचित
रावेर तालुक्यातील 11 धान्य दुकानांवर स्वस्त धान्य जानेवारी उलटूनही पोहोचलेच नाही
रावेर : जानेवारी महिना उलटूनही रावेर शहरातील 11 रेशन दुकानांवर अद्यापही स्वस्त धान्य पोहोचले नसल्याने हातावर पोट असणारे गरीब लाभार्थी हवालदिल झाले आहेत. वेळ आणि पैसे वाचावे म्हणून शासनाच्या जिल्ह्यावरून थेट दुकानांवर धान्य पोहचविण्याच्या योजनेच्या पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. रावेर तालुक्यात अनेक कुटुंब धान्याच्या प्रतीक्षेत असून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
वितरण व्यवस्थेचा उडाला बोजवारा
शासनाने काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यावरून थेट शहरी दुकानांवर धान्य पोहचविण्याचा आदेश काढला होता. यामुळे शासनाचा वेळ व पैसा दोघे वाचेल असे उद्दीष्ट होते परंतु या वितरण व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. जानेवारी महिना संपला परंतु अद्याप शहरी रेशन दुकानांवर शासनाचे धान्य पोहोचले नाही. यामुळे रेशनचे लाभार्थी प्रचंड हवालदील झाले आहेत.
शहरी 19 दुकाने धान्यापासून वंचित
रावेर शहरातील 11 व सावदा शहरातील 8 असे एकूण 19 रेशन दुकानांवर जानेवारी महिन्याचे रेगुलर व मोफतचे धान्य अद्याप पोहोचलेले नाही मात्र तालुक्यातील ग्रामीण भागातील 130 रेशन दुकानांवर मोफत व रेगुलर दोन्ही पोहचले असून वाटप देखिल झाल्याचे पुरवठा विभागा कडून सांगण्यात आले आहे.
धान्य वाहतुकीचा झालाय घोळ
पूर्वी जिल्ह्यावरील एफसीआयच्या गोदामात तालुक्याच्या गोडाऊनवर धान्य पुरवठा केला जात होता परंतु यात शासनाने वेळ व पैसा वाचण्यासाठी शहरी भागासाठी जिल्ह्यावरील एफसीआयच्या गोडाऊनवरुन थेट रेशन दुकानांवर धान्य पोहचवण्याचा निर्णय घेतला होता परंतु धान्य वाहतूक यंत्रणा कोळंबली असून अद्याप रेशन दुकानांवर धान्य पोहचलेले नसल्याने लाभार्थींमधून नाराजी व्यक्त होत आहे.
लाभार्थी मारताय दररोज चकरा
आम्ही नियतन भरले असून शहरी भागातील लाभार्थींचे जानेवारी महिन्याचे धान्य अद्याप आमच्याकडे प्राप्त झालेले नाही तसेच तालुक्याच्या गोडाऊनवर सुध्दा प्राप्त झाले नसल्याने आम्ही धान्य आणू शकलेलो नाही तसेच जळगाव येथून थेट दुकानात धान्य पोहचवले जाणार असल्याचे आम्हाला सांगितले आहे परंतु अद्याप आम्हाला लाभार्थीचे धान्य प्राप्त झालेले नाही. लाभार्थी दररोज धान्यासाठी चकरा मारत असून त्यांना समजावून सांगावे लागत असल्याचे रावेर शहरातील रेशन दुकानदार विठ्ठल पाटील यांनी ‘जनशक्ती’शी बोलताना सांगितले.


