रावेर तालुक्यातील ‘त्या’ ग्रामसेवकांनी बदलीचा लाभ घेतलाच नाही : पंचायत समितीने घेतला ‘यु टर्न’
रावेर : रावेरातील ग्राम सेवकांचे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणाला आता वेगळी दिशा मिळाली आहे. सुमारे एक वर्षापासुन या संदर्भात आंदोलने निवेदने देऊन तालुकाभरातील दिव्यांग बांधवांनी लक्ष वेधले होते. यापूर्वी पंचायत समितीने ग्रामसेवकांनी बदलीचा लाभ घेतल्याचे सांगितले जात होते मात्र मंगळवारी दिलेल्या प्रेस नोटमध्ये बदलीचा लाभ घेतल्याचे दिसून येत नाही, असे नमूद करण्यात आल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, दिव्यांग संघटनेकडून ग्रामसेवकांनी या प्रमाणपत्राचा लाभ घेतला असून आमच्याकडे याचे पुरावे असल्याचादेखील दावा केला आहे.
आधी म्हणतात लाभ घेतला नंतर मात्र केले ‘घुमजाव’
रावेर तालुक्यातील ग्रामसेवकांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचज्ञ ूज्ञक बदलीसाठी घेतल्याचे आधी माहितीच्या अधिकारातून उघड झाले होते. त्यानंतर हे प्रकरण दिव्यांग संघटनानी लावून धरले. या प्रकरणाबद्दल रजनीकांत बारी सांगतात की, माहिती अधिकारतुन आधी हे प्रकरण समोर आले. आम्हाला रावेर पंचायत समितीकडून आलेल्या पत्रव्यवहारात स्पष्ट उल्लेख आहे की, संबंधित ग्रामसेवकांनी प्रमाणपत्राचा बदलीसाठी लाभ घेतला आहे. तर मंगळवारी सुमारे सात महिन्यानंतर या प्रकरणावर गटविकास अधिकार्यांनी माध्यमांना प्रेस नोट देऊन संबधित ग्रामसेवकांनी दिव्यांग प्रमाणपत्राचा लाभ घेतला नसल्याचे सांगितल्याने नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.
दोन पत्रांमुळे वाढली अडचण
या प्रकरणाबाबत खातरजमा केल्यानंतर पहिल्या पत्रात पंचायत समितीकडून मान्य आले की, दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे बदलीत सूट देण्यात आली आहे. अर्थात लाभ घेतल्याचे निष्पन्न झाले तर दुसर्या पत्रात उल्लेख मिळतो की, दिव्यांग प्रमाणपत्राचा कुठलाही लाभ घेतल्याचे दिसून येत नाही त्यामुळे दोन्ही पत्रामुळे येथील गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


