भाषेमुळेच व्यक्त होतात संवेदना : डॉ.ए.डी.गोस्वामी
भुसावळ : भाषा कोणतीही असो त्या भाषेला महत्व फार आहे. भाषेमुळेच व्यक्ती आपल्या संवेदना व्यक्त करतात. आपण भाषेला किती न्याय देतो हे विद्यार्थ्यांवर अवलंबून असते. हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा असून या भाषेचा गौरव भारतात सर्वत्र होत आहे. विश्वभाषा होण्यासाठी हिंदी प्रेमींनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी म्हणाले. भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील हिंदी विभागातर्फे हिंदी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य गोस्वामी बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालय भुसावळ येथील हिंदी विभाग प्रमुख डॉ.पूनम त्रिवेदी होत्या. व्यासपीठावर मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.जे.एफ.पाटील, हिंदी विभागप्रमुख प्रा.डॉ.मनोज पाटील उपस्थित होते.
हिंदी भाषेत रोजगाराच्या विपूल संधी
डॉ.पूनम त्रिवेदी म्हणाल्या की, हिंदी भाषेत रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. पत्रकारीता, पटकथा लेखन, कथालेखन, संवाद लेखन, गीत लेखन, यासह बँकेत आणि रेल्वेत अशा सर्वच क्षेत्रात हिंदी भाषेच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. मराठी विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ.के.के.अहिरे, इंग्रजी विभागाचे प्रा.दीपक पाटील, इतिहास विभागाचे प्रमुख डॉ.प्रफुल इंगोले, प्रा.शीतल सोनवणे, प्रा.अक्षरा साबळे, प्रा.वंदना नेमाडे, प्रा.डॉ.स्वाती महाजन, प्रा.श्रीपाद वाणी, प्रा.सुनील अडकमोल, प्रा.अदनान शेख आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. मनोज पाटील तर सूत्रसंचालन प्रा.कविता पांडव यांनी तसेच आभार डॉ.प्रियंका महाजन यांनी मानले.
