कृषी क्षेत्रातील संधी शोधून युवतींनी उद्योजक व्हावे : नाना पाटील


भुसावळ : योग्य वेळी मार्केटींगच्या संधी पाहून असे उद्योग उभे करून उद्योजिका व्हावे शिवाय शासनाने अनेक योजना कृषी आधारीत महिलांसाठी सुरू केल्या असून ज्यात केंद्रशासन 60 टक्के तर राज्य शासन 40 टक्के अनुदान देते. युवती व महिलांसाठी शासनाने आत्मनिर्भर सारख्या योजना राबवून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत असल्याने लाभ घेण्याचे आवाहन शैक्षिक आगाज व पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष नाना शंकर पाटील यांनी येथे केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभाग व युवती सभा आयोजित आत्मनिर्भर युवती अभियान कार्यक्रम गुरुवार, 18 रोजी महाविद्यालयात झाला. यावेळी शिक्षक नाना पाटील बोलत होते.

बँक फसवणुकीबाबत सतर्कतेचे आवाहन
प्रथम सत्रात बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक गुलशन कुमार यांनी बँक व्यवहारांसंबंधी युवतींमध्ये जनजागृती केली. त्यामध्ये विविध खाती आरटीजीएस, एनईएफटी, युपीआय यासंबंधीची विस्तृत माहिती त्यांनी दिली तसेच हॅकर्स कशा पद्धतीने खातेधारकांची फसवणूक करतात व ती रोखण्यासाठी ग्राहकांनी काय काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी आत्मनिर्भर युवती अभियान अंतर्गत होणार्‍या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. युवतींनी अभियानामध्ये उत्साहाने सामील होण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक प्रा.संगीता धर्माधिकारी तर सूत्रसंचालन डॉ.माधुरी पाटील तसेच आभार प्रा.आर.डी.भोळे यांनी मानले. डॉ.ए.आर.सावळे, डॉ.जे.पी.सरोदे, डॉ.के.पाटील, प्रा.एस.एन.चौधरी, गायत्री नेमाडे, सुशीला भट उपस्थित होत्या.


कॉपी करू नका.