देशात आजपासून आदर्श आचार संहिता लागू : जाणून घ्या सविस्त निवडणूक कार्यक्रम

देशभरात सात टप्प्यात होणार मतदान : महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदान


नवी दिल्ली : देशात 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्व राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये दिनांक 19 एप्रिल ते 1 जून 2024 या कालावधित एकूण सात टप्यांमध्ये मतदान पार पडणार असून 4 जून 2024 रोजी निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे दरम्यान पहिल्या 5 टप्प्यांमध्ये निवडणुका घेण्यात येणार आहेत. तसेच विधानसभेच्या अकोला पश्चिम मतदार संघासाठी लोकसभेच्या निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने येथील विज्ञान भवनात आज पत्रकार परिषद घेवून 18 व्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि डॉ.सुखबीर सिंह संधू यावेळी उपस्थित होते. निवडणूक कार्यक्रमांच्या या घोषणेमुळे देशात आजपासून आदर्श आचार संहिता लागू झाली आहे.

महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदान

पहिला टप्पा- मतदान- 19 एप्रिल : रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर (विदर्भातील 5)

दुसरा टप्पा- मतदान- 26 एप्रिल : बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी (एकूण मतदारसंघ – 8)

तिसरा टप्पा- मतदान- 7 मे : रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले (एकूण मतदारसंघ- 11 )

चौथा टप्पा- 13 मे : नांदेड, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड (एकूण मतदारसंघ- 11)

पाचवा टप्पा- 20 मे : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, आणि दक्षिण मुंबई (एकूण मतदारसंघ – 13 )

लोकसभा निवडणुकांबरोबरच देशातील विधानसभांच्या 26 जागांसाठी पोट निवडणुका होत असून यात महाराष्ट्रातील अकोला पश्चिम मतदार संघासाठी लोकसभेच्या निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

देशात सात टप्प्यात मतदान
देशात 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात 21 राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 102 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी 20 मार्च रोजी अधिसूचना जारी होणार आहे. 27 मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल तर 28 मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. तर 30 मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.

देशात 26 एप्रिल रोजी दुस-या टप्प्यात 13 राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 89 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी 28 मार्च रोजी अधिसूचना जारी होणार आहे. 4 एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल तर 5 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. तर 8 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.

देशात 7 मे रोजी तिसर्‍या टप्प्यात 12 राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 94 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी 12 एप्रिल रोजी अधिसूचना जारी होणार आहे.
देशात 13 मे रोजी चौथ्या टप्प्यात 10 राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 96 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी 18 एप्रिल रोजी अधिसूचना जारी होणार आहे.

देशात 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात 8 राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 49 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी 3 मे रोजी अधिसूचना जारी होणार आहे.

देशात 25 मे रोजी सहाव्या टप्प्यात 7 राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 57 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी 29 एप्रिल रोजी अधिसूचना जारी होणार आहे.

देशात 1 जून रोजी सातव्या टप्प्यात 8 राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 57 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी 7 मे रोजी अधिसूचना जारी होणार आहे.

ठळक मुद्दे

  • 1 कोटी 84 लाख मतदार (वयाची 18 वर्षे पूर्ण झालेले ) देशात प्रथमच मतदाते
  • 18 ते 29 वर्ष वयोगटातील 21 कोटी 50 लाख मतदार
  • देशात 85 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील 82 लाख मतदार
  • 100 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील 2 लाख मतदार
  • 85 वर्षावरील व 40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांगता असणार्‍या व्यक्तींसाठी देशात प्रथमच घर जावून मतदान
  • 12 राज्यात महिला मतदारांचे प्रमाण प्रति 1 हजार पुरुषांच्या तुलनेत 1 हजारापेक्षा जास्त. देशात 1 हजार पुरुषांमागे सरासरी 948 महिला मतदार

निवडणूक यंत्रणेसमोर ही चार आव्हाणे

आदर्श आचार संहितेचे उल्लंघन करण्याबाबत बळाचा प्रयोग (मसल पावर), पैशांचा वापर (मनी पावर), चुकीची माहिती (मिस इन्फॉर्मेशन) आणि माध्यम समन्वय समितीच्या नियमांचे उल्लंघण ही निवडणूक यंत्रणेसमोरील महत्वाची आव्हाण असून यावर मात करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले.


कॉपी करू नका.