कापूस शेतीतील महिलांच्या आरोग्य व पोषणासाठी ; जळगाव जिल्ह्यात ‘वात्सल्य प्लस’ उपक्रम कार्यान्वित
युनिसेफ, जिल्हा परिषद, कृषी विज्ञान केंद्र आणि जैन इरीगेशन जळगांव यांचा संयुक्त पुढाकार; ग्रामस्तरीय कर्मचार्यांचे प्रशिक्षण
जळगाव (25 एप्रिल 2026) : कापूस शेतीमध्ये कार्यरत असलेल्या गर्भवती महिला, स्तनदा माता आणि प्रजननक्षम वयोगटातील महिलांच्या आरोग्य व पोषणाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने जळगांव जिल्ह्यात वात्सल्य प्लस’ हा सर्वसमावेशक आणि बहुआयामी उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील महिलांना शेती कामकाजाच्या दरम्यान उद्भवणार्या आरोग्यविषयक धोक्यांपासून सुरक्षित ठेवणे, त्यांचे पोषण सुधारणा करणे आणि आरोग्यविषयक योग्य सवयी रुजवणे हे या उपक्रमाचे प्रमुख ध्येय आहे.
युनिसेफच्या सहकार्याने महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत राबविण्यात येणार्या या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत जळगांव जिल्ह्यातील कापूस लागवडीचे प्रमुख तालुके एरंडोल, अमळनेर, पारोळा, जामनेर, पाचोरा, चाळीसगांव, धरणगांव, जळगांव आणि चोपडा यांचा समावेश करण्यात आला आहे. कापूस शेती ही जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा मानली जाते आणि या शेतीत मोठ्या प्रमाणावर महिलांचा सहभाग असतो. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही काळाची गरज बनली आहे.

कापूस लागवडीपासून ते काढणीपर्यंत विविध टप्प्यांमध्ये रासायनिक कीटकनाशकांची मोठ्या प्रमाणावर फवारणी केली जाते. या प्रक्रियेदरम्यान महिलांचा थेट रसायनांशी संपर्क येण्याची शक्यता असते, ज्यामुळे गर्भवती महिलांच्या गर्भातील बालकांवर तसेच स्तनदा मातांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. याशिवाय वाढते तापमान, उन्हामध्ये दीर्घकाळ काम करणे, जड ओझे वाहणे आणि व्यस्त दिनचर्येमुळे पोषणाकडे होणारे दुर्लक्ष हे देखील त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरते. या पार्श्वभूमीवर वात्सल्य प्लस’ उपक्रम महिलांना सुरक्षित शेती पद्धती, वैयक्तिक संरक्षण उपाययोजना आणि संतुलित आहाराचे महत्त्व याबाबत जागरूक करण्यासाठी एक प्रभावी माध्यम ठरत आहे.
प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा यशस्वी
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा स्तरावरील आरोग्य व महिला व बालविकास विभागातील अधिकार्यांना प्रशिक्षित करण्यात आले. त्यानंतर दुसर्या टप्प्यात 20 ते 23 एप्रिल 2026 या कालावधीत ग्रामस्तरीय कर्मचार्यांचे चार सत्रांमध्ये सखोल प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
या प्रशिक्षण सत्रांचे आयोजन पंचायत समिती, अमळनेर व धरणगांव तसेच कृषी विज्ञान केंद्र, जळगांव येथे करण्यात आले. प्रशिक्षणात 159 कृषी सखी. 8 आशा गटप्रवर्तक, 29 प्रभाग समन्वयक आणि 5 कृषी सहाय्यक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सहभागी कर्मचार्यांना त्यांच्या गावांमध्ये जाऊन महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये देण्यात आली.
तज्ज्ञांचे सखोल मार्गदर्शन
प्रशिक्षणादरम्यान कृषी विज्ञान केंद्र, जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि युनिसेफ मुंबई येथील तज्ज्ञांनी विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. शास्त्रीय पद्धतीने कापूस लागवड, कीटकनाशकांचा सुरक्षित वापर, फवारणी करताना घ्यावयाची काळजी, गर्भवती व स्तनदा मातांचे योग्य पोषण, तसेच हवामान बदलामुळे वाढणार्या किडींचे व्यवस्थापन यावर सखोल चर्चा करण्यात आली.
या प्रशिक्षणासाठी मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रदीप लासुरकर (वैद्यकीय अधिकारी), डॉ. बी. डी. जडे (वरिष्ठ शास्त्रज्ञ व विभाग प्रमुख, अॅग्रोनॉमी, जैन इरिगेशन), डॉ. वैभव सुर्यवंशी (प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र), श्री. शरद जाधव (विषय तज्ञ), डॉ. गोपाळ पंडगे (राज्य सल्लागार, युनिसेफ), श्री. नितीन वसईकर (विभागीय सल्लागार) तसेच श्री. राज बासेकर आणि श्री. सम्राट खांडेकर (चॠखचड, वर्धा) यांनी मोलाचे तांत्रिक मार्गदर्शन केले.
प्रशासकीय समन्वयाचे उत्तम उदाहरण
’वात्सल्य प्लस’ उपक्रमाची अंमलबजावणी ही विविध विभागांच्या समन्वयातून प्रभावीपणे करण्यात येत आहे. जिल्हा परिषद जळगांवचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी. कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा उपक्रम यशस्वीपणे पुढे जात आहे. विविध विभागांमधील समन्वय आणि सहकार्यामुळे कार्यक्रमाची परिणामकारकता अधिक वाढली आहे.
गावपातळीवर जनजागृती हा केंद्रबिंदू
या उपक्रमाचे मुख्य मुख्य उद्दिष्ट म्हणजे कापूस शेतात काम करणार्या महिलांना त्यांच्या आरोग्याशी संबंधित जोखमींबाबत जागरूक करणे आणि त्यांना स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सक्षम करणे. कीटकनाशकांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, कामाच्या ठिकाणी सुरक्षितता पाळणे, संतुलित व पौष्टिक आहार घेणे आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची काळजी घेणे या बाबींबाबत ग्रामपातळीवर व्यापक जनजागृती करणे हा या प्रकल्पाचा केंद्रबिंदू आहे.
वात्सल्य प्लस’ उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न होत असून, भविष्यात हा उपक्रम महिलांसाठी सुरक्षित आणि सशक्त शेती वातावरण निर्माण करण्यास महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
