खाजगी कंपनीतील अभियंत्यांची तापी पात्रात उडी
रात्री उशिरापर्यंत शोध : घटनेचे कारण गुलदस्त्यात
सावदा : तामिळनाडूतील मेटलमन कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत असलेल्या व सध्या भुसावळात राहत असलेल्या राजरत्न देविदास तायडे (36, वरणगाव रोड, भुसावळ) यांनी गुरुवारी दुपारी तापी सावदा शहराजवळील हतनूर धरणाच्या मोठ्या पुलावरून तापी पात्रात उडी घेतल्याने खळबळ उडाली आहे. तायडे यांचा रात्री उशिरापर्यंत पाण्यात शोध घेण्यात आला मात्र त्यांचा शोधू लागू शकला नाही. या संदर्भात भुसावळ तालुका, वरणगाव व नशिराबाद पोलिसांनाही सूचित करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सावदा येथून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या तापी नदीच्या पुलावर तायडे यांनी चारचाकी (एम.एच. 12 एफ.के. 9625) लावल्यानंतर तापी पात्रात उडी घेतली. काही नागरीकांनी ही घटना पाहताच सावदा पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी धाव घेत शोध कार्य सुरू केले. राजरत्न यांच्या कुटुंबात पत्नी, आई, दोन भाऊ आहेत.

