भुसावळात रीडींग न घेताच सरासरी ग्राहकांना मिळता वीज बिले
शिवसेनेचे उर्जा मंत्र्यांकडे तक्रार : वीज बिल वाटपात दिरंगाईचा आरोप
भुसावळ : शहरातील वीज ग्राहकांना रीडींग न घेताच सरासरी वीज बिले देण्यात येत असून वीज बिल वाटपात दिरंगाई होत असल्याने ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे शिवसेनेचे शहर प्रमुख बबलू बर्हाटे यांनी तक्रार केली आहे. पुढील कारवाईकडे आता लक्ष लागले आहे.
शिवसेनेने केली तक्रार
वीज ग्राहकांना विजेच्या वापराची बिले मिळत नसतानादेखील बिल भरले नाही या कारणास्तव विजेचे मीटर काढून नेण्याच्या वीज वितरण अधिकारी व कर्मचार्यांच्या मनमानी कारभाराविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. भुसावळातील अधिकार्यांना विचारणा केली असता नवीन कंत्राटदारांला नुकतेच काम देण्यात आल्याने वीज बिल वाटपात उशीर झाल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक कोरोनानंतर गत तीन महिन्यापासून देयके वाटप केली जात शिवाय रीडींग न घेताच सरासरी देयके तयार केली जात असल्याने ग्राहकांना याची माहितीच मिळत नसल्याने वीज ग्राहकांमध्ये संतापाची भावना आहे.

50 हजार ग्राहकांना वीज बिल मिळालेच नाही
भुसावळ विभागातील वीज ग्राहक वीज वितरण कंपनीविरोधात संतप्त झाले असून गेल्या तीन ते चार महिन्यांपासून साधारण 50 हजार ग्राहकांना वीज बिल मिळालेले नाही. सरासरी देयकांचा पाऊस सुरूच असताना दुसरीकडे वीज बिले न भरल्यास कारवाईचा बडगा उभारला जात आहे. अनेक महिन्यांपासून वीज बिले मिळत नसल्याने ग्राहक वीज कर्मचार्यांना विचारणा करीत आहेत तर वीज वितरण अधिकारी व कर्मचारी हे सांगत आहेत की, वीज बिले तुम्ही काढा व तुम्ही भरा नाही तर मीटर काढले जातील. अधिकार्यांच्या या मनमानीविरोधात ग्राहक संतप्त झाले असून यामध्ये शिवसेनेकडे तक्रारी आल्याचे बबलू बर्हाटे यांनी सांगितले. रीडींग न घेणार्या व वीज बिल वाटप करण्यात दिरंगाई करणार्या ठेकेदारवर कारवाई करावी अन्यथा ठेका काढून तेथे दुसरा ठेकेदार नेमावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
तर तीव्र आंदोलनाचा इशारा
तक्रारीची वीज कंपनीने दखल न घेतल्यास शिवसेना जिल्हाप्रमुख व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हा संघटक विलास मुळे, भुसावळ तालुकाप्रमुख समाधान महाजन, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

