रावेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा : भाजपाची मागणी
रावेर : अतिवृष्टी व वादळामुळे शेतकर्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. कोरोनामुळे आर्थिक अडचणीत आलेला शेतकरी या अस्मानी संकटामुळे आणखीनच हतबल झाला आहे. या परीस्थितीत शेतकर्यांना शासनाने धीर देण्यासाठी वादळ, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे न करता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच कोरडवाहू शेतीला एकरी 50 तर बागायती शेतीला एकरी एक लाख रुपये आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी भाजपने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
कृषी पंपाचे वीज बिलही माफ व्हावे
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, कृषी पंपाचे वीज बिल माफ करावे, कोरडवाहू व बागायती शेतीला आर्थिक मदत जाहीर करावी, 2019-20 ता वर्षातील नुकसानीची विमा रक्कम त्वरीत मिळावी, विजेचे ट्रान्सफॉर्मर देतांना शेतकर्यांची अडवणूक करू नये, संपूर्ण कर्जमाफी करावी आदी मागण्यांचे निवेदन भाजप पदाधिकार्यांनी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना दिले. यावेळी भाजपचे किसान सेलचे प्रमुख सुरेश धनके, किसान सेलचे तालुकाध्यक्ष राहुल महाजन, तालुका सरचिटणीस सी.एस.पाटील, हरलाल कोळी, अॅड.सूर्यकांत देशमुख, राजेंद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



