पाण्याच्या बाटलीमुळे अभियंत्याचा अपघाती मृत्यू
नवी दिल्ली : कारमधील पाण्याच्या एका बाटलीमुळे इंजिनिअरचा मृत्यू झाला. नोएडा-ग्रेटर नोएडा एक्स्प्रेसवेवर दिल्लीतील राहणारे इंजिनिअर अभिषेक झा मित्रासोबत कारमधून ग्रेटर नोएडाच्या दिशेने जात असताना भरधाव कार उभ्या असलेल्या ट्रकवर जोरात जाऊन आदळली. या अपघातात अभिषेक यांचा मृत्यू झाला. तर त्यांचा मित्र गंभीर जखमी झाला. पोलिसांनी अपघाताचे कारण हे कारमध्ये असलेली पाण्याची बाटली असल्याचे सांगितले आहे.
सीटवर ठेवली होती पाण्याची बाटली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा अभिषेक हे कार चालवत होते. तेव्हा सीटच्या मागे ठेवलेली पाण्याची एक बाटली सरकून अभिषेक यांच्या पायाखाली आली. समोर असलेला ट्रक पाहून कारवर नियंत्रण मिळवण्यासाठी अभिषेक यांनी ब्रेक लावला मात्र ब्रेक पेंडलच्या खाली बाटी असल्याने ब्रेक लागला नाही आणि गाडी वेगाने जाऊन ट्रकवर आदळली.




पाण्याची बाटली ब्रेक पैंडलखाली आल्याने अपघात
पोलिसांनी सांगितले की, हा अपघात सेक्टर 144 जवळ झाला. ज्यामध्ये गाडी चालवत असलेल्या अभिषेक यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार अभिषेक झा हे ग्रेटर नोएडामधील एका कंपनीमध्ये इंजिनिअर होते. अभिषेक हे शुक्रवारी रात्री मित्रासोबत रिनॉल्ट ट्राइबर गाडीमधून नोएडा येथून ग्रेटर नोएडाकडे जाण्यासाठी निघाले होते. त्यादरम्यान, सेक्टर 144 जवळ त्यांची वेगाने जाणारी कार रस्त्याच्या कडेला बंद पडलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. पाण्याची बाटली ब्रेक पैंडलखाली आल्याने हा अपघात घडला.