राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी अशी दिली प्रतिक्रिया
सातारा : शब्द हे शस्त्र असतात, ते समजून बोलावे. वयाने राज्यपाल मोठे आहे, निदान त्यांनी तरी वक्तव्य मागे घ्यावे. अनेकांचे फोन आले. जे चुकीचे आहे ते चुकीचे आहे. इतिहास आहे, तो आपण बदलू शकत नाही. ‘राजमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरू होत्या. तरीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य करून शिवप्रेमींसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्याने राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे,’ अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
शिवाजी महाराज कर्तबगारीवर मोठे
जलमंदिर येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना उदयनराजे म्हणाले की, ‘शहाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणास्थान होते. राजमाता जिजाऊ त्यांच्या गुरू होत्या. अनेक संतांबद्दल महाराजांना आदर होता. तो त्यांनी कायम राखला. शिवाजी महाराज हे कर्तबगारीवर मोठे झाले, त्यांना मावळ्यांची साथ होती.’ अमूक एक नसते तर शिवाजी महाराज घडले नसते, असे राज्यपाल कोश्यारी म्हणालेत पण ते एवढ्या मोठ्या पदावर आहेत, त्यांनी इतिहासाचा अभ्यास करावा, त्यांनी इतिहास वाचला असता तर ते तसे बोलले नसते, असेही खासदार उदयनराजे भोसले म्हणाले.


