जळगाव जिल्ह्यातील मोबाईल सेवेपासून वंचित 52 गावांना फोरजी सेवांसाठी मिळणार टॉवर
रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांच्या पाठपुराव्याला यश
मुक्ताईनगर : जळगाव जिल्ह्यातील मोबाईल सेवेपासून वंचित 52 गावांना फोरजी सेवांसाठी मिळणार टॉवर मिळणार आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ तंत्रज्ञान स्टॅक प्रणालीचा वापर करून भारत संचार निगम लि. (बीएसएनएल) द्वारे हा प्रकल्प अंमलात आणला जाईल, तसेच त्याला युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड मार्फत अर्थसहाय्य केले जाणार आहे. खासदार रक्षात खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील श्रेणी 1 साठी 26 व श्रेणी 2 साठी 83 गावांची शिफारस केली होती. त्यापैकी श्रेणी 1 साठी 15 तर श्रेणी 2 साठी 37 अशा एकूण 52 गावांची फोरजी सेवेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यासाठी राज्यतील महसूल विभागाकडून मोबाईल टॉवर उभारणीसाठी परवानगी घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी खासदार रक्षा खडसे यांनी दिली.
विविध सेवा वितरणाला मिळणार प्रोत्साहन
हा प्रकल्प ग्रामीण भागात मोबाईल कनेक्टिविटी उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या दृष्टीकोनाच्या दिशेने महत्वाचे पाउल आहे. हा प्रकल्प मोबाईल ब्रॉडबँडच्या माध्यमातून विविध ई-प्रशासन सेवा, बँकिंग सेवा, टेली-मेडिसिन, टेली-शिक्षण अशा विविध सेवा वितरणाला प्रोत्साहन देईल आणि ग्रामीण भागात रोजगार निर्माण करेल, असे यावेळी खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले.
