चित्रपट-टी.व्ही. शिक्षणासाठीचे प्रभावी माध्यम : शिक्षणाधिकारी निलेश पाटील
जळगाव (25 एप्रिल 2026) : चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते शिक्षणाचे एक प्रभावी माध्यम आहे. या महोत्सवांमुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो आणि त्यांना नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. बालवयातच उत्तम साहित्याची आणि कलेची आवड निर्माण होणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी केले. अजिंठा फिल्म सोसायटी जळगाव, बालरंगभूमी परिषद आणि रिफ्लेक्शन फाऊंडेशन संचलित पालकशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गंमत जंमत बालचित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा शुभारंभ करतांना ते बोलत होते.
‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सवाचा दुसरा दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील उपस्थित होते. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मुलांसाठी मटर पनीर, मंग्या , रिबेल आणि देवा तुला शोधु कुठे या ४ विशेष जागतिक दर्जाच्या बाललघूचित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना निलेश पाटील यांनी मुलांशी संवाद साधला. चित्रपटाच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. चिमुकल्यांच्या उत्साहाने भाऊंचे उद्यान परिसर बहरून गेला होता.
प्रारंभी अजिंठा फिल्म सोसायटीचे सचिव विनीत जोशी, बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, पालक शाळेचे शैलेश शिरसाठ यांच्या हस्ते शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अजिंठा फिल्म सोसायटीचे सचिव विनीत जोशी,कोषाध्यक्ष डॉ. संजय हांडे, देवगिरी चित्र साधनेचे प्रांत संयोजक किरण सोहळे , पालक शाळेचे रत्नाकर पाटील, डॉ.विद्या पाटील, शैलेश शिरसाठ, बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश शुक्ल यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय व कार्यक्रमांचे सूत्रसंचालन व आभार बालरंगभूमी परिषदेचे प्रमुख कार्यवाह विनोद ढगे यांनी केले. यावेळी प्रा.जयेंद्र लेकुरवाळे यांनी गाणी व खेळांच्या माध्यमातून मुलांशी संवाद साधून त्यांना आज दाखविलेल्या चित्रपटांतील मूल्यांची माहिती दिली.

बालचित्रपट सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी चित्रसाधनेचे कमलाकर रुगे, वर्षा उपाध्ये, पार्थ ठाकर, पालकशाळेचे डॉ. अनिल भोकरे, डॉ. वीणा महाजन, शैलेश शिरसाठ, डॉ. विशाखा पाटील, श्वेता जैन, मकरंद डबीर, अजिंठा फिल्म सोसायटीच्या विश्वस्थ डॉ.श्रध्दा पाटील शुक्ल, अनघा गोडबोले, बालरंगभूमी परिषदेचे कोषाध्यक्ष सचिन महाजन, सदस्य आकाश बाविस्कर, मोहित पाटील, नाना सोनवणे, हर्षल पवार यांनी परिश्रम घेतले.
उद्या बालचित्रपट महोत्सवाचा शेवटचा दिवस असून, दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवराज अष्टक’ या मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या चित्रपट मालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि बुद्धिवान कामगिरीवर आधारित ‘रणपती : आग्र्याहून सुटका’ हा चित्रपट बालप्रेक्षकांना दाखविण्यात येणार आहे. तरी पालकांनी या चित्रपटाला आपल्या पाल्यांना घेऊन यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
