माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे म्हणाले : या तर चोराच्या उलट्या बोंबा

खडसे उवाच : अवैध धंदे बंद करण्यात आल्याने आमदार बैचेन : मुक्ताईनगरात महिला सुरक्षित नाहीत


भुसावळ : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे आणि त्यांच्या कन्या अ‍ॅड.रोहिणी खडसे यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप शनिवारी मुक्ताईनगरचे आमदार तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली असतानाच माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनीदेखील या आरोपांना जोरदार उत्तर दिले आहे. या तर चोराच्या उलट्या बोंबा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अवैध धंद्यांविरोधात तक्रारी करण्यात आल्यानंतर उत्पन्नाचे मार्ग झाल्यानेच आमदार, असे तथ्यहिन आरोप करीत असल्याचे ते म्हणाले आहेत. घडलेल्या सर्व प्रकारांबाबत सीसीटीव्ही तपासल्यास ‘दुध का दुध पाणी का पाणी’ होईल, असा दावाही त्यांनी ‘ब्रेकींग महाराष्ट्र’शी बोलताना व्यक्त केला.

उत्पन्नाचे मार्ग झाले बंद
मुक्ताईनगर तालुक्यात आमदारांच्या आशीर्वादाने अवैध धंदे सुरू होते मात्र हे अवैध धंदे बंद करावेत या संदर्भात अ‍ॅड.रोहिणी व जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांनी निवेदन दिल्यानंतर कारवाई सुरू झाल्याने अवैध धंदे बंद झाले आहेत व यांच्या उत्पन्नाचे मार्ग बंद झाल्याने त्यांची अस्वस्थता वाढली असल्याचा आरोप खडसेंनी केला.



नाथाभाऊ म्हणाले ; मुक्ताईनगरात महिला सुरक्षित नाहीत
एका महिलेच्या घरी जावून अश्लील संभाषण करण्यात आले शिवाय दुसर्‍या एका प्रकरणात महिलेला तर घरी बोलावण्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य आहे. माध्यमाचा प्रतिनिधी पाठवल्यास त्याबाबतची ऑडीओ क्लीप ऐकवतो त्यामुळे आमदार काय आहेत हे जनतेलाही कळेल, असेही खडसे म्हणाले. मुळात चंद्रकांत पाटील हे शिवसेनेचे आमदार नाहीत, राष्ट्रवादीच्या मदतीने ते निवडून आले आहेत त्यामुळे राष्ट्रवादीचे ते उपकार विसरले आहेत, असेही खडसे म्हणाले.

या तर गुंड प्रवृत्तीच्या धमक्या
अवैध धंद्याविरोधात आम्ही आवाज तीव्र करणार असल्याचे सांगून खडसे म्हणाले की, आरटीओकडून हप्ते घेणे, अवैध वाळूचा व्यवसाय, सट्ट्याचे धंदे यांच्याच कार्यकर्त्यांचे असल्याचेही माजी मंत्री खडसे म्हणाले. यापूर्वी आमदारांवर 307 चा गुन्हा दाखल होता मात्र माझ्या मुलाने हे प्रकरण मिटवल्याचा दावा त्यांनी केला. आमदारांनी केलेला जीवाला धोका असल्याचा आरोप हास्यास्पद असून या तर गुंड प्रवृत्तीच्या धमक्या असल्याचा आरोप खडसेंनी केला. मुक्ताईनगरात आता महिला सुरक्षीत राहिल्या नसल्याची टिप्पणीही त्यांनी करीत एका हवालदाराच्या मुलाकडे एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर माया जमली कशी? याचा शोध घेणेही गरजेचे असल्याचे ते म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !