वैचारीक जागृतीसाठी पर्यावरणपूरक उपक्रमांची गरज
पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे : पर्यावरण जनजागृती प्रश्नमंजुषा प्रमाणपत्र प्रदान समारंभ
भुसावळ : जन्माला आल्यापासून पर्यावरणाकडून आपल्याला सर्व काही मोफत मिळत आले आहे परंतु आपण पर्यावरणाची काळजी नाही घेतली तर आपल्याला भविष्यात हे सर्व विकत घ्यावे लागेल. प्रत्येकाने आपल्या ज्ञानाचा वापर पर्यावरण संवर्धनासाठी करावा. समाजातील वैचारीक जागृतीसाठी पर्यावरणपूरक उपक्रमांची गरज असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी येथे केले. भुसावळ येथील धन्वंतरी भवनात निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ यांच्यातर्फे आयोजित पर्यावरण जनजागृती ऑनलाईन प्रश्नमंजुषा 2020 उपक्रमांतर्गत प्रमाणपत्र वाटप समारंभात ते अध्यक्षीय मनोगतातून बोलत होते.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर वैद्य रघुनाथ अप्पा सोनवणे, शिक्षण सभापती अॅड.तुषार पाटील, मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील, कार्याध्यक्ष डॉ.जगदीश पाटील यांची उपस्थिती होती. प्रारंभी दीपप्रज्वलन व धन्वंतरी देवतेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविकात मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील यांनी मंडळाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. डॉ.जगदीश पाटील यांनी कोविडकाळात पर्यावरण जनजागृती प्रश्नमंजुषा या उपक्रमाची संकल्पना मांडून त्याची निर्मिती केली. त्यात विद्यार्थी, शिक्षक, पालक, नागरिक, वकिल, डॉक्टर, पत्रकार यांच्यासह सर्वच स्तरातील व्यक्तींनी सहभाग नोंदविला. त्यामुळे त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून भरघोस प्रतिसाद मिळाल्याचेही नाना पाटील यांनी सांगितले. श्रुतिका जोशी, गौरी इखे, खुशबू तडवी, अक्षदा देवडा, संजय ताडेकर यांनी तसेच व्यासपीठावरील अॅड.तुषार पाटील, वैद्य रघुनाथ अप्पा सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. प्रश्नमंजुषा सोडवणारी पहिली विद्यार्थिनी भक्ती पाटील हिचे प्रमाणपत्र देऊन डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी कौतुक केले.

राज्यभरातून अडीच व्यक्तींचा स्पर्धेत सहभाग
संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे अडीच हजार व्यक्ती प्रश्नमंजूषेत सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी प्रातिनिधिक स्वरुपात श्रुतिका जोशी, गौरी इखे, खुशबू तडवी, अक्षदा देवडा, सारंग सूर्यवंशी, प्रशांत पाटील, योग सूर्यवंशी, मनीषसिंग पाटील, योगेश पाटील, श्रीकांत जोशी, उदय जोशी, तानिया लोकवाणी, युक्ती चोरडिया, सुरेंद्रसिंग पाटील, गौतम चोरडिया, विजय लुल्हे, शिशिर जावळे, आर.के.पाटील, मनीषा ताडेकर, एस.एस.अहिरे, प्रकाश जोशी, सौरभ जोशी, धीरज लोकवाणी, सोनाली देवडा, विवेक ठाकूर, भैय्या उर्फ सरफराज तडवी, निखील शिरसाट, पत्रकार विशाल सूर्यवंशी, छायाचित्रकार हबीब चव्हाण यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, विविध क्षेत्रातील मान्यवर, पालक यांचाही मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन डी.के.पाटील यांनी तर आभार डॉ.जगदीश पाटील यांनी मानले.

